

Citizens in Dhule district are distressed as the mercury soars to 44 degrees.
धुळे पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्याचे तापमान 44 अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे दुपारी रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसून येते आहे. शेतकरी आणि मजुरांनी उष्णतेपासून बचाव होण्याच्या हेतूने सकाळी लवकर कामाला सुरुवात करून दुपारच्या उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
धुळ्यात तापमानाचा कहर सुरू झाला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच अशी अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात 42 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. तर काल शनिवारी 42. 8 इतकी नोंद करण्यात आली. मात्र आज तापमान ४४ अंशापर्यंत पोहोचले आहे.
त्यामुळे सकाळी 11 वाजल्यानंतर रस्त्यावर तुरळक वाहने दिसून आली. मात्र एक वाजेनंतर रस्ते निर्मनुष्य असल्याचे दिसून आले. दरम्यान उष्णतेमुळे कोणताही अपाय होऊ नये, यासाठी प्रशासनाने आता तयारी सुरू केली असून जिल्हा शासकीय रुग्णालय, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर देखील उष्माघातावर उपचार करणारे कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
शेतकरी आणि मजुरांनी दुपारच्या उन्हामध्ये जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उन्हामुळे मळमळ, उलटी किंवा तत्सम प्रकार जाणवल्यास नजीकच्या आरोग्य केंद्र समवेत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.