नगर तालुका : नगर तालुक्यात सुमारे 70 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी, लागवड झाली. सद्यस्थितीत तालुक्यातील काही भागात गव्हाची सोंगणी सुरू असून, काही ठिकाणी गहू काढणीला आला आहे. गव्हाचे पीक जोमदार आले असले तरी गावरान कांदा उत्पादकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. गावरान कांद्याला अनेक भागात पाणीटंचाईची झळ बसणार असल्याचे चित्र आहे.
नगर तालुका दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. परंतु तालुक्यात झालेल्या जलसंधारण व मोठ्या प्रमाणातील बंधार्यांमुळे गेल्या दशकांपासून रब्बी पिके जोमदार येत आहेत. रब्बी हंगामाचे उत्पादन वाढले आहे. चालू वर्षी तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. जेऊरपट्ट्यातील बहुतांशी तलाव, बंधारे भरलेच नाहीत. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवणार आहे. इमामपूर सारख्या डोंगर उतारावर वसलेल्या गावांना गव्हाच्या पिकालाही एका पाण्याची कमतरता जाणवली. त्यामुळे गव्हाचे उत्पन्न देखील घटले आहे.
ज्वारीचे पठार म्हणून ओळखल्या जाणार्या तालुक्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने नगर तालुक्याची कांद्याचे पठार म्हणून ओळख निर्माण होत आहे. लाल कांदा, रांगडा कांदा, गावरान कांदा उत्पादनात तालुका अग्रेसर आहे. कांद्याच्या वाढत्या उत्पादनामुळे राज्य तसेच राज्यातील अनेक व्यापार्यांनी तालुक्यात स्थायिक होऊन कांद्याच्या खरेदी विक्रीचा व्यापार सुरू केला आहे. संपूर्ण जिल्ह्यात शेताच्या बांधावर कांद्याची खरेदी नगर तालुक्यातूनच होत आहे. तालुका हा कांदा खरेदी विक्रीचे केंद्रबिंदू बनला आहे.
पावसाळ्यात पिंपळगाव माळवी तलाव, जेऊर, इमामपूर, डोंगरगण पट्ट्यातील बहुतांशी तलाव कोरडेच राहिले. नद्यानाले वाहते झालेच नाहीत. त्यामुळे जेऊर पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकर्यांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यात सुमारे 16 हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड करण्यात आली आहे. परंतु डोंगर उतारावरील गावांनी पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
जेऊर, इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी या पट्ट्यामध्ये पाणीटंचाईची झळ जाणवण्यास लागली आहे. मका, कडवळ चारा पिके जोमात आहेत. परंतु गावरान कांद्यासाठी पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहे. तालुक्यात गव्हाचे पीक जोमदार आले असून, कांद्याच्या उत्पादनात मात्र घट होणार असल्याचे चित्र दिसत आहे. चास, अकोळनेर, रुईछत्तीशी, चिचोंडी पाटील पट्ट्यातील बहुतांशी तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे या भागातील शेतकर्यांना रब्बी हंगामाबाबत थोडा दिलासा मिळाला आहे.
भौगोलिक संरचनेनुसार तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गर्भगिरीच्या डोंगर रांगा विखुरलेल्या आहेत. त्यामुळे अनेक गावे डोंगर रांगांच्या तीव्र उतारावर कुशीत वसलेली आहेत. त्यामुळे अशा गावांनी उन्हाळ्यात भूजल पातळी झपाट्याने खालावत असून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. चालू वर्षी देखील अनेक गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागणार आहेत. रब्बीतील चारा पिके, तसेच गव्हाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात होणार असले तरी गावरान कांद्याच्या उत्पादनावर पाणीटंचाईचे संकट मंडांतर आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते.
ससेवाडी गाव कांदा उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. चालू वर्षी लाल कांद्याचे उत्पादन झाले. परंतु पाण्याअभावी गावरान कांद्याची लागवड झाली नाही. सीना नदीचे उगमस्थान असलेल्या ससेवाडी गावात मोठे कांद्याचे उत्पादन होत असते. परंतु सद्यस्थितीत गावरान कांद्याची लागवड झालेली नाही, पिण्याच्या पाण्यासाठी लवकरच टँकर सुरू करावी लागणार असल्याचे माजी उपसरपंच शंकर बळे यांनी सांगितले.
बहिरवाडीत टँकरचा प्रस्ताव!
बहिरवाडी गावामध्ये अनेक शेतकर्यांनी पाण्याअभावी गावरान कांद्याचे पीक सोडून दिले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, पंचायत समितीकडे सादर करण्यात येणार असल्याचे सरपंच अंजन येवले यांनी सांगितले.