

पाथर्डी तालुका: अवकाळी पावसामुळे शहरातील नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. सध्या शहरात भूमिगत गटारी व जलवाहिनीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. या कामात काढलेली माती रस्त्यावर पसरल्याने ठिकठिकाणी चिखल साचला असून, नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. विशेषतः शहरातील उपनगरांमध्ये ही परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
शहरातील उपनगरांत काळवट्या कळ्याच्या मातीमुळे रस्ते चिखलमय झाले असून, त्यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहने अडकत आहेत. काही भागांत नागरिकांना पायवाटेने चिखल तुडवत चालावे लागत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यात साचलेला चिखल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोका निर्माण करत आहे.
शहरातील जुने बसस्थानक मागील वर्षी नूतनीकरण करून त्याचा परिसर डांबरीकरण करण्यात आला होता. मात्र, अवकाळी पावसात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे अ वकाळी पावसाळ्यात या परिसरात अधिक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. (Ahilyanagat News Update)
दरम्यान, पाथर्डी शहरातील देखणे गल्ली येथे सोमवारी (दि. 12) महावितरणच्या एका वीज खांबामध्ये वीज प्रवाह उतरल्यामुळे त्या खांबाला स्पर्श झाल्याने एका गायीचा मृत्यू झाला. गोसेवक सोमनाथ बंग व रमेश बोरुडे यांनी सकाळी या गोमातेवर अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नगरपरिषद व संबंधित यंत्रणांनी पावसाळ्यापूर्वी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.
लाखो रुपये पाण्यात..
पाथर्डी शहरातील जुन्या बसस्थानकाचे काम आत्ताच करण्यात आले. मात्र, त्याची पहिल्याच अवकाळी पावसात दुरवस्था झाली असून, बनवलेला खडीकरणाचा रस्ता हा पूर्णतः जलमय झाला आहे. कुठेही पाणी काढून देण्याची व्यवस्था केली नाही. लाखो रुपये पाण्यात गेले, असा आरोप शिवसेना उबाठा चे ज्येष्ठ शिवसैनिक नवनाथ चव्हाण यांनी केला.