नगर: सध्या देशभरात वेगळी विचारधारा आलेली आहे. ज्या जिल्ह्यात एकेकाळी साम्यवादी, गांधी-नेहरु विचाराचा पगडा होता. आता याच जिल्ह्यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा वाढत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात आले. वाढत्या विचारधारेचा समाजावर काय परिणाम होत आहे. हे दुर्लक्षून चालणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. (Latest Ahilyanagar News)
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त अहिल्यानगर येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात शनिवारी (दि.30) आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार नीलेश लंके, आमदार सत्यजित तांबे, आमदार मोनिका राजळे, आमदार हेमंत ओगले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार भानुदास मुरकुटे, नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, लहू कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, रावसाहेब म्हस्के, सत्कारमूर्ती अरुण कडू व शोभा कडू यांचे नातेवाईक आणि हिंतचिंतक उपस्थित होते.
प्रारंभी शरद पवार यांच्या हस्ते अरुण कडू यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. शरद पवार म्हणाले की, नगर जिल्हा पूर्वी साम्यवादी विचारसरणीचा जिल्हा होता. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर अण्णासाहेब शिंदे, आबासाहेब निंबाळकर, भाऊसाहेब थोरात या नेत्यांवर यशवंतराव चव्हाण यांचा प्रभाव पडला.
त्यामुळे काँग्रेसमय झालेला जिल्हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने वाटचाल करत होता. स्वातंत्र्याचा लाभ शेवटच्या घटकांपर्यत गेला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. आज देशभरातील चित्र बदलले असून, देशभरात वेगळाच विचार रुजत चालला आहे. त्याला नगर जिल्हा अपवाद नाही.
एकेकाळी साम्यवादी, गांधी-नेहरु विचाराने भारलेल्या जिल्ह्यात संघ आणि भाजपची विचारधारा वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या विचाराच्या परिणामाकडे दुर्लक्ष करुन भागणार नाही. असे त्यांनी म्हटले. .
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी अरुण पाटील कडू यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हे तर त्यांनी शेतकरी संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन, रयत शिक्षण संस्था अशा अनेक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत कामांचा ठसा उमटविला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सत्तेचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देऊन त्यावरील पदाधिकार्यांना देखील मानसन्मान मिळणे गरजेचे आहे. कडू पाटील हे त्या काळात आमचे रोल मॉडेल होते असे सपकाळ यांनी आवर्जून सांगितले.
अरुण कडू सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, या सोहळ्याला माझा विरोध होता. वडिलांबरोबरच पवार साहेब, मारुतराव घुले, दादासाहेब तनपुरे, भाऊसाहेब थोरात या ज्येष्ठ नेत्यांचे पाठबळ मिळाले. त्यामुळेच राजकीय क्षेत्राबरोबरच समाजकार्यात पुढे जाऊ शकलो, असे सांगत त्यांनी हा सन्मान केवळ माझा नसून समाजाचा असल्याचे आवर्जून नमूद केले. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी प्रास्ताविक केले.
चेष्टामस्करी... देव आणि हशा
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, अरुण कडू पाटील हे आमचे तिसर्या क्रमाकांचे मेहुणे. डावी विचारसरणी जपणारे आणि शेतकरी, वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी कायम लढणारे. आम्ही सर्व मेहुण्यांची चेष्टामस्करी केली. परंतु अरुण कडू पाटलांची कधीच चेष्टा केली नाही. कारण डाव्या विचाराचा माणूस गंभीर असतो, म्हणताच हशा पिकला. कडू पाटील देव मानत नाहीत. परंतु मी माझ्या देवाकडे त्यांना दीर्घआयुष्य मागतो. असे म्हणताच पुन्हा हशा पिकला.