

आश्वी : संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील हजारवाडी परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्री दोन बंद घरे फोडण्यात आली. साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 70 हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
पानोडी शिवारातील हजारवाडी येथील कोळेकर वस्तीवर शुक्रवारी (16 जानेवारी) रात्री ही घटना घडली. चोरट्यांनी सुरुवातीला अनिल देवराम कोळेकर यांच्या बंद घराला लक्ष्य केले. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील पत्र्याच्या पेटीसह कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी अडीच तोळे सोन्याचे दागिने व 20 हजार रुपयांची रोकड लंपास केली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारी कारभारी कृष्णा कोळेकर यांच्या घराकडे वळवला. त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील 50 हजार रुपयांची रोकड व तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शनिवारी सकाळी 7:15 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, चोरट्यांनी एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. यामध्ये 3 ग्रॅम सोन साखळी व वाटी 7 ग्रॅमचे सोन्याचे मणी, 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, सोन्याचे झुबे, राजकोट रिंगा, नथ, पळी व सोन्याचा सर रोकड 70 हजार रुपये (अनिल कोळेकर यांचे 20 हजार तर, कारभारी कोळेकर यांचे 50 हजार रुपयांचा) यामध्ये समावेश आहे.
चोरीची माहिती मिळताच पानोडीचे सरपंच गणपत हजारे, भारत शेवाळे यांच्यासह ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आश्वीचे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांनी पोलिस ताफ्यासह घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. फिर्यादी अनिल कोळेकर यांच्या तक्रारीवरून आश्वी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सोनवणे व सहाय्यक पोलिस निरीक्षक ए .डी. शिंदे करीत आहेत.
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे सावट आहे. ग्रामीण भागात चोरट्यांचे धाडस वाढत आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून, ती अधिक कडक करावी, अशी मागणी सरपंच गणपत हजारे , भारत शेवाळे व ग्रामस्थांनी केली आहे.