

वाळकी: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काहींना मुख्यमंत्री होण्याचे तर, खासदारकीमुळे हवेत गेलेल्यांना बारा झीरोचे स्वप्न पडले. मात्र विधानसभा निवडणुकीत जनतेने दिवसा स्वप्न बघणार्यांना स्वतःच्या मतदार संघातच चारीमुंड्यात चीत करून जमिनीवर आणल्याचा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता थोरात व लंके यांना लगावला. नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे ते बोलत होते. यावेळी आ. शिवाजीराव कर्डिले, आ. विक्रम पाचपुते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदी उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले, नगर दक्षिणेतील दुष्काळी भाग पाणीदार करण्याचे स्व. बाळासाहेब विखेंचे स्वप्न आम्हीच पुर्ण करणार आहोत. साकळाई योजनेसाठी सुजय विखे यांनी मोठे काम केले. मात्र या योजनेबाबत लोकांचा बुद्धीभेद करून लोकसभेला निवडून आलेल्या खासदाराला साकळाई योजनेसाठी काय करायच हे माहित आहे का, विधासभेला स्वतः च्या तालुक्यातील लोकांनी नाकारले ते साकळाई योजना करणार काय, अशी टीका करताना आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत महायुतीचे उमेदवार निवडून द्या, साकळाई योजनेची जबाबदारी माझी असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
आता पुणेकरांची दादागिरी मोडून काढणार!
नगर-श्रीगोंदा तालुक्यातील 12 हजार हेक्टर क्षेत्र साकळाई योजनेमुळे ओलीताखाली येणार आहे. मात्र साकळाई योजनेला आडकाठी आणण्याचे काम पुणेकर मंडळी करायचे. माजी खा. सुजय विखेंनी साकळाई सर्व्हेक्षण पुर्ण केले. पाणी उपलब्ध असल्याचा दाखला मात्र पुणेकरांनी दिला नाही. राज्याचा जलसंपदा विभाग माझ्याकडे आल्याने आता पुणेकरांची दादागिरी मोडून काढणार असल्याचे विखे यांनी सांगितले.