Pankaja Munde flood relief survey: अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून दिलासा; मंत्री पंकजा मुंडे यांचा पाथर्डी दौरा
पाथर्डी : अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. लवकरच सरकारकडून मदत केली जाईल, असे आश्वासन पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. सरकारने 2200 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी दिली.(Latest Ahilyanagar News)
अतिदृष्टीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे मुंडे यांनी पाहणी केली. कीर्तनवाडी व खरवंडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना धीर त्यांनी दिला. या दौऱ्यात आमदार मोनिका राजळे, धनंजय बडे, डॉ.मृत्युंजय गर्जे, मुकुंद गर्जे, अमोल गर्जे, बाळासाहेब गोल्हार, राहुल कारखेले, संजय किर्तने, नितीन किर्तने, शुभम गाडे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, आप्पासाहेब शिरसाट, रामहरी खेडकर, माणिक बटुळे, प्रदीप पाटील, तहसीलदार उद्धव नाईक उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, अतिवृष्टीमुळे तुमच्यावर, घरांवर आणि शेतीवर जे संकट कोसळले आहे, ते पाहून मला खूप वेदना होत आहेत. जमिनी वाहून गेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या पिकांत गाळ साचला आहे, घरांची पडझड झाली आहे, जनावरांचे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीत सरकार तुमच्यासोबत ठामपणे उभे आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी मी स्वतः कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा करणार आहे, असेही आश्वासन त्यांनी दिले.
अतिवृष्टीची परिस्थिती केवळ पाथर्डीत नाही, तर सर्वत्र आहे. पूरस्थितीबद्दल पालकमंत्र्यांशी बोलेन. शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे मंत्री मुंडे म्हणाल्या. त्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्याकडून पाथर्डी व शेवगावातील नुकसानीची माहिती घेतली. तसेच, श्रीपातवाडी पूल वाहून गेल्याने त्याचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री मुंडेे म्हणाल्या, गेले नऊ दिवस मी सतत दौऱ्यावर आहे. बीडलगतच्या अनेक गावांना भेट देत आहे. लोकांची अपेक्षा असते की मी प्रत्येक गावात जावे, पण ते प्रत्यक्षात शक्य नाही. मात्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देईल, त्यांच्या पाठीशी उभे राहील, याबाबत मी कटिबद्ध आहे.

