अमोल गव्हाणे
विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. राजकीय पटलावर उमेदवारांना पडलेल्या मतांची गोळा बेरीज सुरू असतानाच इच्छूक उमेदवारांना आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वेध लागले आहेत.
तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गण आहेत. आढळगाव, काष्टी, येळपणे, बेलवंडी, कोळगाव, मांडवगण असे सहा गट आहेत. जवळपास दोन वर्षे लांबणीवर पडलेल्या निवडणुका आता कधीही लागू शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने जिल्हा परिषद गट व गणाची फेररचना केली होती. मात्र, राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर महायुती सरकारने केलेली फेररचना रद्द ठरवत गट व गणाची रचना जैसे थे ठेवली.
श्रीगोंदा पंचायत समितीची सत्ता काँगेस- राष्ट्रवादीच्या ताब्यात होती, तर सहापैकी चार जिल्हा परिषद सदस्य भाजपचे, तर राष्ट्रवादी एक अन् काँगेस एक अशी सदस्यसंख्या होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबणीवर पडल्या आहेत.जानेवारी महिन्यात यावर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यात निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकाअगोदर घेतल्या. आता विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत.जवळपास सगळ्याच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विधानसभा निवडणुकीत आपल्या नेत्यांसाठी पळापळ केली असल्याचे पाहायला मिळाले.
विधानसभा निवडणुकीत भाजपचे विक्रमसिंह पाचपुते निवडून आहेत.राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात भाजपचे पारडे उजवे मानले जाते. त्यामुळे भाजपकडून प्रत्येक गटात उमेदवारी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे काँगेस- राष्ट्रवादी (शरद पवार गट) शिवसेना पक्षात शांतता दिसत असली तरी काँगेस, राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची संख्याही कमी नाही.
निवडणुकीला अद्याप काही महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी इच्छुकांनी आतापासूनच मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत निर्णय काहीही होवो, पण आपली निवडणुकीची तयारी जोरात सुरू असल्याचे एका इच्छुक उमेदवाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.