मागील पाच वर्षांत मुळा धरणातून वांबोरी चारीच्या तलावामध्ये एकदाही पाणी आलेले नाही. या भागातील शेतकर्यांचा लोकप्रतिनिधीने मोठा भ्रमनिरास केला आहे. लोकप्रतिनिधीने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतकर्यांची दिशाभूल करू नये, अशी टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी आ. प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता केली.
कर्डिले यांचा मंगळवारी (दि. 12) केशवशिंगवे, मिरी, रूपेवाडी, शंकरवाडी, कडगाव, मोहोज बुद्रुक, मोहोज खुर्द, आडगाव, कामतशिंगवे या परिसरात प्रचार दौरा झाला. प्रत्येक गावात कर्डिले यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कर्डिले म्हणाल, माझी निवडणूक जनतेने हातात घेतली असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते आता बिनबुडाचे आरोप करत सुटले आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवत असताना दहशत गुंडगिरीचे आरोप करत आहे. मात्र जनता आता भूलथापांना बळी पडणार नाही.
15 वर्षांमध्ये राहुरी पाथर्डीत कधी कोणावर दहशत दादागिरी केल्याचे दाखवून द्यावे असे आवाहन कर्डिले यांनी केले. 40 वर्षापासून त्यांच्याकडे राहुरी नगरपालिकेची सत्ता आहे. सत्तेच्या माध्यमातून शेतकर्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकली आणि कवडी मोल किंमतीत खरेदी केली. पुढे तेच आरक्षण शासनाकडून उठवली जातात. तुम्ही काय दिवे लावले हे जनतेला माहित आहे. माझी कितीही बदनामी करा लोक माझ्या बरोबर असल्याचा दावा कर्डिले यांनी केला.
प्रत्येक निवडणुकीमध्ये आमच्यावर दहशत गुंडगिरी केली जात असल्याचा आरोप केला जातो. प्रत्यक्षात मात्र विरोधी उमेदवार खर्या अर्थाने दहशत आणि दादागिरी करत आहेत. मागील पाच वर्षांत मिरी परिसरात वांबोरी चारीचे पाणी पोहोचलेच नसल्यामुळे शेतकर्यांचा संताप या निवडणुकीतून दिसून येणार आहे. मिरीच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खोसपुरीपासून पुढे मिरीपर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकून मिरीसह परिसराचा पाणीप्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी मिरी येथील नाथा बाजीराव गवळी 51 हजार रुपये, डॉ. बबनराव नरसाळे 21 हजार रुपये, तर प्रसाद वेताळ यांच्याकडून 11 हजार रुपयांची मदत रोख स्वरूपात या वेळी देण्यात आली.
मागील पाच वर्षांमध्ये मुळा धरणातून वांबोरी चारीच्या माध्यमातून लाभधारक पाझर तलावामध्ये भरपूर पाणी दिले असल्याचे राहुरी मतदार संघाचे लोकप्रतिनिधी गावागावात जाऊन सांगत आहेत. प्रत्यक्षात मिरी परिसरात पाच वर्षांत पाणीच आले नसून, मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला चुकीची माहिती कोणी देऊ नये.
साहेबराव गवळी, माजी सरपंच, मिरी