लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिल्यानंतर कोर्टात जाणार्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिणींना तीन हजार रुपये देण्यासह अनेक सवलती देण्याची घोषणा केली, परंतू महिलांसह शेतकरी, युवक व सामान्य जनतेला महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात कोणता आधार दिला, असा सवाल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी विरोधकांना केला. केवळ खोट्या घोषणा देऊन जनतेला गाजर दाखविण्याचे काम त्यांनी केले, असे टीकास्त्र सोडत महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या महिला धोरणाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रूक येथे कार्यकर्ते व महिलांची संवाद साधताना त्या बोलत होत्या. शालिनीताई विखे म्हणाल्या, शिर्डी मतदार संघात जाती-पातीचे राजकारण न करता आम्ही समाज जोडण्याचे काम केले आहे. सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे नवे पर्व मतदार संघामध्ये सुरू आहे. कुणी कितीही ताकत लावली तरी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मोठ्या मताधिक्क्यांनी निवडून येतील, असा ठाम विश्वास शालिनीताई विखे यांनी व्यक्त केला.
जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून महिला बचत गटांचे संघटन केले. महिलांचा वापर केवळ राजकारणासाठी न करता विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना रोजगार निर्मिती करुन दिली आहे.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री विखे पाटील नेहमीच त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील, डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आजपर्यंत मंत्री विखे पाटील यांनी समाज जोडण्याचे काम केले आहे. कुटुंब प्रमुख म्हणून मतदार संघातील सर्व समाजाची जबाबदारी मंत्री विखे पाटील सक्षमपणे पार पाडीत आहेत, असे शालिनीताई विखे यांनी आवर्जून सांगितले.
40 हजार महिलांचे संघटन करून त्यांना वेगवेगळ्या व्यवसायातून सक्षम करण्याचे मोठे काम केले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना आधार दिला आहे. चूल आणि मूल येथपर्यंतच महिलांना सिमित न ठेवता त्यांना आर्थिक स्वावलंबी, साक्षरतेतून सक्षम केले आहे. शिर्डी मतदार संघातील बचत गटांचा आदर्श राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.