

नगर: शेती व्यवसाय करताना अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना तत्काळ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १ हजार ४७९ लाभार्थ्यांना २९ कोटी २६ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आले आहे.
ज्या कोणा शेतकर्यांचा अपघात झाला असेल अशा पात्र लाभार्थ्यांनी वा त्यांच्या वारसांनी अपघातानंतर ३० दिवसांत प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन बंद पडल्यामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरु केली.
या योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांचा अपघाती मृत्यू तसेच दोन्ही डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा एक डोळा व एक हात अथवा एक पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास २ लाख रुपये, तर एक डोळा, एक हात किंवा एक पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास १ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते.
सन २०२२-२३ पर्यंत विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत दावे नामंजूर होणे तसेच दाव्यांच्या निकाली विलंब होणे अशा अडचणी येत होत्या. त्यामुळे शासनाने १९ एप्रिल २०२३ पासून विमा कंपन्यांऐवजी थेट शासकीय अनुदानाच्या स्वरूपात ही योजना लागू करण्यात आल्याने जिल्ह्यातील शेकडो शेतकरी कुटुंबांना जलद गतीने आर्थिक मदत मिळाली आहे.
या योजनेच्या जुन्या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १८३ लाभार्थ्यांना ३ कोटी ६४ लाख रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात २५२ लाभार्थ्यांना ५ कोटी १ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. नवीन योजना लागू झाल्यानंतर २०२३-२४ मध्ये २४५ प्रस्तावांसाठी ४ कोटी ८२ लाख रुपये, २०२४-२५ मध्ये ४४९ प्रस्तावांसाठी ८ कोटी ७६ लाख रुपये आणि २०२५-२६ मध्ये ३५० प्रस्तावांसाठी ६ कोटी ९४ लाख रुपये वितरित करण्यात आल्याचे कृषी विभागाने म्हटले.
या अपघाताचा समावेश
शेती करताना शेतकर्यांच्या अंगावर वीज पडणे, सर्पदंश, पूर, रस्ता अथवा रेल्वे अपघात, जनावरांचा हल्ला, उंचावरून पडणे, विषबाधा, विजेचा शॉक, पाण्यात बुडून मृत्यू, विंचूदंश, खून, नक्षलवाद्यांकडून हत्या, दंगल, बाळंतपणातील मृत्यू तसेच अन्य अपघातांचा या योजनेत समावेश आहे.