

पारनेर: शरद पवार यांनी सातत्याने नगर जिल्ह्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले. पुणे जिल्ह्याशी लढायचे असेल, हक्काचे पाणी मिळवायचे असेल तर विखे पाटील परिवाराशिवाय पर्याय नाही. येत्या पाच वर्षात पारनेरकरांना हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय विखे परिवार स्वस्थ बसणार नाही.
गेल्या चाळीस वर्षात पुणे विरूध्द नगर हा संघर्ष सुरू होता. आता जलसंपदा विभागाचे मंत्रीपद राधाकृष्ण विखे यांच्याकडे असून यावेळी मात्र नगर जिल्हा जिंकणार असा विश्वास माजी खासदार डॉ. विखे यांनी व्यक्त केला. (Latest Ahilyanagar News)
शहरातील विकास कामांचे भूमिपूजन तसेच तालुक्यातील महायुती कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात डॉ. विखे बोलत होते. आमदार काशिनाथ दाते यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या कार्यक्रमास अशोक सावंत, विश्वनाथ कोरडे, विनायक देशमुख, राहूल शिंदे, अश्विनी थोरात, विक्रमसिंह कळमकर, विजय औटी, अशोक चेडे, युवराज पठारे, सुषमा रावडे, संदीप ठुबे, कल्याण काळे, सुधामती कवाद उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे म्हणाले, व्यासपीठावर असणारे जानेवारीमध्ये एकत्र असतील हे सांगता येत नाहीत. हे सगळे एकत्र आले म्हणून विधानसभेत विजय संपादन करू शकलो. हा विजय तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे. प्रत्येक माणसाने परिवर्तनाचा निर्धार केला होता. विखे पाटलांच्या पराभवाचा बदला घेण्याच्या भावनेतून प्रत्येक जण पळाला, त्यामुळे हा विजय साकारला गेला.
एका विचाराच्या विरोधात हे परिवर्तन झाले. कोणी म्हणत असेल की हे माझ्यामुळे झाले तर तो मूर्ख असेल. ज्यावेळी कार्यकर्ते अंतर्मनातून पळतात त्यावेळी नेता तयार होतो. त्यामुळे व्यासपीठावरील कोणालाही मी विचारत नाही.
जे खाली बसले त्यांना नेहमी विचारतो. माझा लोकसभेला पराभव झाला नसता तर स्व. बाळासाहेब विखे यांचे संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचा पराभव करण्याचे 40 वर्षांचे स्वप्न पूर्ण करता आले नसते. संगमनेर विघानसभेला मी आमदार होऊ शकत होतो, मात्र एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याच्या भावनेतून अमोल खताळ यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणल्याचे डॉ. विखे यांनी ठामपणे सांगितले.
विखे यांच्या दौर्याच्या निमित्ताने निमंत्रण पत्रिकेवरील फोटोंच्या प्रोटोकॉलवरून करण्यात आलेल्या तक्रारींवर बोलताना डॉ. विखे म्हणाले, मानापमान सोडून द्या, यापुढे कोणाचा फोटो लाऊ नका. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो लावा. मनाचा मोठेपणा दाखविला पाहिजे, स्पर्धा कशाला हवी?, पदे येतात, जातात, तुमची ओळख तुमच्या कामातून होते. पदाला नव्हे तर माणसाला किंमत मिळाली पाहिजे असे डॉ. विखे म्हणाले.
ज्याला जनतेचा कौल, त्यालाच उमेदवारी !
प्रत्येक निवडणूकीत अनेक इच्छुक असतात, मात्र जनता ज्याला कौल देईल त्याला आगामी काळात महायुतीची उमेदवारी दिली जाईल. जनसामान्य माणसाचे प्रश्न सोडविणाराच नेता होऊ शकतो, पदावर बसलेला नाही असे सांगत डॉ. सुजय विखे यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीतील इच्छुकांपुढे भूमिका स्पष्टपणे मांडली.
नगरपंचायतीची सत्ता विरोधात असताना सर्वसामान्य जनता पाठीशी उभी राहिली. वैयक्तिक योजनांमुळे निधीची चणचण असल्याने अजित पवार यांनी नवीन आमदार म्हणून नगरविकास खात्यातून पारनेर शहरासाठी 6 कोटी 50 लाख रूपयांचा निधी दिला. कधीही कोणाविषयी तक्रारी करत नाही, महायुती अबादीअबाद राहिली पाहिजे, यासाठी आपसातील मतभेद दूर करणे गरजेचे आहे. महायुतीचे निर्णय सर्वांनी मान्य केले पाहिजेत. एकत्रपणे सर्वानी निवडणूका लढवल्या तर विजय निश्चित आहे.
- काशिनाथ दाते, आमदार.
पारनेर शहराचा पाणी प्रश्न सुटला तर एमआयडीसीचे लोक येथे राहण्यासाठी येतील. शहराचा विकास होईल. आ. दाते व सुजय विखे यांनी हा प्रश्न मार्गी लावावा. शहर विकास आराखडा प्रलंबित आहे. तो मार्गी लागला तर अनेक विकास कामे मार्गी लागतील.
- युवराज पठारे, नगरसेवक.
दूध संघाच्या निवडणूकीमुळे नवचैतन्य निर्माण झाले. लोकसभेतील पराभवानंतर मतदारसंघ सुन्न झाला. दाते सर यांच्यासारखा सुसंस्कृत, शांत आमदार तालुक्याला मिळाला. ढवळपुरीच्या जमिनींवरील शिक्के पुसणार असे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले होते, आज ते खासदार आहेत, ढवळपुरीकरांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी ते का पुढाकार घेत नाहीत?
- राहुल शिंदे पाटील, तालुकाध्यक्ष, भाजप.