

नगर: डेंग्यूमुक्त अभियानामुळे जनजागृती झाली असून, रुग्णांची संख्या कमी झाली आहे. भविष्यकाळात डेंग्यूमुक्त अहिल्यानगर निर्माण करायचे असून, विद्यार्थ्यांनी पुढे येऊन स्वच्छता दूत म्हणून काम करावे, असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.
महापालिका व स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्यातर्फे दातरंगे मळा परिसरात डेंग्यूमुक्त अभियानप्रसंगी ते बोलत होते. या वेळी या वेळी उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, माजी नगरसेवक सचिन शिंदे, श्यामआप्पा नळकांडे, प्रा. अरविंद शिंदे, संदीप दातरंगे, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, डॉ. दिलीप बागल, डॉ. सृष्टी बनसोडे, डॉ. ऐश्वर्या दळवी, मुख्याध्यापिका वसुधा जोशी, शारदा होशिंग, शपाकत सय्यद आदी उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
आयुक्त डांगे म्हणाले की, महापालिकेतर्फे शहरात 14 आठवड्यांपासून डेंग्यूमुक्त अभियान सुरू आहे. 15 हजार 418 घरांची तपासणी केली असून, 40 हजार 927 पाणीसाठे तपासले आहेत.
यामध्ये 637 पाणी साठ्यामध्ये अळ्या आढळल्या असून, ते पाणीसाठे नष्ट केले आहे. या परिसरामध्ये औषध फवारणी करून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली आहे. मागील वर्षात सप्टेंबरपर्यंत 54 डेंग्यूचे रुग्ण शहरामध्ये आढळले होते. यावर्षी 10 रुग्ण आढळले असल्याचे त्यांनी सांगितले.
नळकांडे म्हणाले की, नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस स्वच्छता मोहीम राबवून आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. आयुक्त डांगे यांनी सुरू केलेले हे अभियान कौतुकास्पद आहे. या वेळी माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. सृष्टी बनसोडे यांनी केले. आभार आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी मानले.
पथनाट्य, अभंगांद्वारे जनजागृती
समर्थ शाळेच्या विद्यार्थिनींनी पथनाट्यद्वारे डेंग्यूबाबत जनजागृती केली, तसेच आशा सेविकांनी भारुड सादर केले. त्याचबरोबर सिस्टर यांनी अभंगाद्वारे डेंग्यूबाबत जनजागृती केली आणि घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.