मस्साजोग येथील सरपंचाचा खून ही घटना निंदनीय आहे. परंतु, आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यामध्ये विविध पदावर नोकरीला असलेल्या वंजारी समाज बांधवाच्या बिंदू नामावलीबद्दल जे वक्तव्य केले ते विखारी असून हेतूपुरस्सर असल्याचे दिसते. त्या वक्तव्याला आमचा आक्षेप असून त्यातून नव्या पिढीचे नुकसान होणार आहे, अशी खंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अॅड. प्रताप ढाकणे यांनी केली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंचाच्या खून प्रकरणाबद्दल बोलताना आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी वंजारी समाजातील नोकरदारांच्या बिंदू नामावलीचा विषय छेडला. तसेच, त्यांना सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी दुजोरा दिला. त्यातून वंजारी समाजाचे खच्चीकरण होत असल्याचे प्रताप ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग घटनेशी काही संबंध नसताना एका विशिष्ट जातीचे लोक जिल्ह्यात काम करतात.
त्यांना एनटी ड मधून नोकरी, त्यांना ओबीसीतून नोकरी आणि त्यांना ओपनमधूनही नोकरी मिळते. त्यास सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी दुजोरा दिला आणि याच विषयाला माझा आक्षेप आहे. राज्यघटनेने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. त्या अधिकारानुसारच वंजारी समाजातील तरुण आज विविध क्षेत्रांमध्ये नोकरीवर आहेत. त्यांच्या कष्टाचा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी ते यश मिळविले. परंतु, काही विशिष्ट हेतू ठेवून अशा पद्धतीने विधान केले जाते. कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वंजारी समाजाबद्दल असे विधाने करणे एक प्रकारे समाजाला बदनाम करण्यासारखे आहे. त्यामुळे वंजारी समाजाबद्दल इतर समाज बांधवांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. आ. सुरेश धस यांनी जाणीवपूर्वक विखारी पद्धतीने मुद्दा मांडला आहे.
आजही आमच्या समाजातील लोक ऊसतोडणीला जातात. आम्हाला कोणाच्या ताटातले हिसकून घ्यायचे नाही पण, आमच्या हक्काने जे आम्हाला मिळाले आहे. त्याबद्दल यांना पोटसुळ का असे वक्तव्य पण आ. सुरेश धस यांनी कशाबद्दल केले, असेही ढाकणे म्हणाले.
आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे कोणीही समर्थन करू शकत नाही. या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. गुन्हेगारांना जात नसते ती एक प्रवृत्ती असते. परंतु, एखाद्या व्यक्तीमुळे संपूर्ण समाज बदनाम करणे चुकीचे आहे, असेही अॅड. ढाकणे म्हणाले.