

नगर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसह इतर मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी (दि.9) मूकमोर्चा काढला. या मोर्चात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(Latest Ahilyanagar News)
सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना परीक्षा देण्यास भाग पाडल्याने राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांसह सर्वच शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. या निर्णयाबाबत शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी (दि.9) सुटीच्या दिवशी मूकमोर्चा काढण्यासाठी जिल्हाभरातील शिक्षक अहिल्यानगरातील सिंचन भवनात जमले. या ठिकाणाहून दुपारी मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चात समन्वय समितीचे नेते सुनील पंडित, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे बापूसाहेब तांबे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तथा सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे विठ्ठल उरमुडे, शेखर उंडे, राजेंद्र ठोकळ, बबन गाडेकर, प्रवीण झावरे, मनीषा वाकचौरे, उत्तरेश्वर मोहळकर, वैभव सांगळे, प्रसाद शिंदे, अन्सार शेख, गोकुळ कळमकर, विकास डावखरे, अमोल पवार, उत्तरेश्वर मोहोळकर आदी सहभागी झाले होते. सरकारच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात चुकीचे धोरण राबविले जात असल्याचा व शिक्षकांना शैक्षणिक कामे सोडून इतर कामात गुंतवले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
मोर्चात विविध मागण्यांचे फलक घेऊन शिक्षक मोर्चात सहभागी झाले. मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या सभेत अनेकांनी हा शिक्षकांवरील हा अन्याय असून, या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारादेखील दिला.
राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, अशोक मासाळ, विलास प्रेद्राम, सुरेश जेठे, मुकुंद शिंदे, पुरुषोत्तम आडेप आणि ग्रामसेवक युनियनच्या वतीने गोकुळ पाटील यांनी आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दिला. या आंदोलनात बबन गाडेकर, दत्तापाटील कुलट, गोरक्षनाथ विट नोर, नारायण पिसे, ज्ञानेश्वर शिरसाठ, अर्जुनराव शिरसाठ, बाबासाहेब खरात, राजेंद्र निमसे आदी सहभागी झाले होते.
एकप्रकारे शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. अनुभवाची कदर न करता, शिक्षकांनर परीक्षा देण्याची वेळ शासनाने आणली आहे.
आप्पासाहेब शिंदे
प्राथमिक शिक्षकांनाच टीईटी सक्ती का? देशातील सर्व संवर्गाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही सक्ती करावी.
बापूसाहेब तांबे
जुनी पेन्शन बंद करून सरकारने फसवले आहे. आमदार, खासदार, अधिकारी, पदाधिकारी यांनाही विविध परीक्षांची सक्ती करावी.
महेंद्र हिंगे
टीईटीची सक्ती अन्यायकारक आहे. शासनाने पुनर्विचार याचिका तत्काळ दाखल करावी, अन्यथा असंतोष व्यक्त होईल.
सुनील पंडित