

नगर: राहुरी शहरातील खाटीक गल्ली येथे कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या 25 गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने सुटका केली. पोलिसांनी घटनास्थळावरून 4 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक समीर अभंग, पोलिस अंमलदार लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, भिमराज खर्से, चालक चंद्रकांत कुसळकर यांच्या पथक तयार करून गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्यासाठी रवाना केले.
15 मे 2026 रोजी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करून अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकास गोपनीय माहिती समजली की, राहुरी शहरात खाटीक गल्ली येथे काही व्यक्तींनी पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याचे उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवले आहेत.
पोलिस पथकाने तत्काळ राहुरी शहरातील खाटीक गल्ली येथे छापा घातला असता गोवंशीय जातीचे जनावरे चारा पाण्याविना निर्दयतेने डांबून ठेवल्याचे दिसन आले. पथकाने जनावरे कोणाचे आहेत याची परिसरात विचारपूस केली असता अन्सार कुरेशी व वशीम कुरेशी व अन्य लोकांच्या मालकीची असल्याचे समजले.
मात्र, पोलिस आल्याची चाहू लागताच ते पळून गेले होते. पोलिस पथकाने एक लाख 62 हजारांची 25 जनावरे, एक लाखांचे गोमांस, दोन लाखांचा टेम्पो असा 4 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.