Dr. Vijay Kumar Gavit : भाजपचे मंत्री डॉ. गावित परिवाराविरोधात शिंदे गटासह सर्वपक्षीय नेते एकवटले | पुढारी

Dr. Vijay Kumar Gavit : भाजपचे मंत्री डॉ. गावित परिवाराविरोधात शिंदे गटासह सर्वपक्षीय नेते एकवटले

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा निर्मितीनंतर काय साध्य झालं? यावर विचार मंथन करीत नंदुरबार जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षातील प्रमुख नेते व पदाधिकारी यांनी एकत्र येऊन ‘डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम’ स्थापन करीत ‘मुहूर्तमेढ विकसित नंदुरबारची’ या उपक्रमाचा शुभारंभ केला. तथापि एकत्रित आलेल्या या नेत्यांनी एका सुरात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या पारिवारिक वर्चस्वावर आणि कार्यपद्धतीवर बोचरी टीका केली. एवढेच नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व मिळून एक उमेदवार देण्याचे संकेत सुद्धा दिले. Dr. Vijay Kumar Gavit

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यात काँग्रेसचे माजी मंत्री ॲड. के.सी पाडवी, आ.राजेश पाडवी, आ.शिरीषकुमार नाईक, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी आ.कुवरसिंग वळवी, भाजपचे नागेश पाडवी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, जि.प सदस्य विजय पराडके, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयापलासिंह रावल, उद्योजक किरण तडवी, साक्रीचे माजी नगराध्यक्ष नाना नागरे आदी उपस्थित होते. Dr. Vijay Kumar Gavit

जिल्ह्याचा विकास लोक चळवळीचा व अस्मितेचा विषय झाला पाहिजे. जिल्हा निर्मितीच्या 25 वर्षांपूर्वीच्या पार्श्वभूमीवर आणि वस्तुस्थितीवर चर्चा होणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे खरे शिल्पकार ही जनताच असून, राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम ‘मुहूर्तमेढ विकसित नंदुरबारची…’या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी केले.

याप्रसंगी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी रघुवंशी म्हणाले, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम राजकारण विरहित काम करणार आहे. लोकप्रतिनिधी आदिवासी आदिवासींमध्ये शासनाच्या योजना राबवत असताना भेदभाव करीत आहेत. समाजात विषमता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला विरोध आहे. आम्ही आमदार, खासदारांच्या शर्यतीत नाहीत. परंतु, आम्हाला जिल्ह्याचा खरा विकास करून दाखवायचा आहे. यापुढे जिल्ह्याचा समतोल विकास साधणारे लोकप्रतिनिधी जनतेने निवडून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचे अभिजीत पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, मुंबई येथे 9 फेब्रुवारीरोजी वर्ल्ड स्टेट सेंटर येथे शासनाचे प्रतिनिधी, उद्योजक व नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील पुणे, मुंबई, नाशिक, सुरत येथे स्थायिक झालेल्या नागरिकांची बैठक होईल. केळी, पपई, मिरची व कापूस या सुमारे वार्षिक ३ हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या प्रमुख पिकांची प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button