जळगाव, पुढारी वृत्तसेवा : तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. पाणी वेगाने वाहू लागल्याने हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामुळे दर सेकंदाला धरणातून २४ हजार ५०९ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. तापी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, तापी नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हतनूर धरणातून पाणी सोडल्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून २४ हजार ५०९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाची पाणी पातळी सध्या २०८.६७० मीटर आहे. एकूण जलसाठा १६१.१० दलघमी एवढा आहे. तापी नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची तापी नदीच्या पुलावर मोठी गर्दी होऊ लागली आहे.
जिल्ह्यात तसेच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपत्रातील पाणी पातळीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियंत्रण कक्षातर्फे नदीकाठच्या सर्व नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तसेच नदीकाठच्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये व सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. जुनाट तसेच मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. पूरग्रस्त भागातून वाहने चालवू नये. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा