नाशिक : माहेरी गेलेल्या नवरीला आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्या मुलाच्या गाडीला अपघात; दोन ठार चौदा जखमी
सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वाघधोंड येथील नवरदेवाचा शिंगळचोंड येथील वधूशी थाटामाटात विवाह संपन्न झाला होता. पाच दिवसांनी नववधूला घेण्यासाठी सासरची मंडळी माहेरी जाते याला आदिवासी समाजाच्या रिती रिवाजानुसार मुळूट्या असे म्हटले जाते.
लग्न झाल्यानंतर माहेरी गेलेल्या नवरीला आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला. वाघधोंड गावाजवळ झालेल्या या अपघातात दहा वर्षीय बालक हेमराज रमेश थविल (रा. गारमाळ) हा गंभीर जखमी होता. त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेताना त्याचा मृत्यू झाला. तर सत्तर वर्षीय महिला कमी सयाजी देशमुख (रा. वाघधोंड) हिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अकरा जणांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाघधोंड येथील व-हाडी शिंगळचोंड येथे नववधूला घेण्यासाठी एम. एच. १५.एच.एच.९७८७ या पिक अप वाहनाने वीस ते पंचवीस जण घेण्यासाठी गेले होते. अगदी वाघधोंड गावाजवळ आल्याने चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने पंधरा ते वीस फुट खोल असलेल्या भातशेतीच्या खाचरात उलटी सुलटी झाल्याने काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान झाला. यामध्ये जखमी रुग्ण असे प्रल्हाद लक्ष्मण महाले (वय 16 रा.गणेशनगर), मिनाबाई गोविंद गावित (वय-56), सुमन यशवंत देशमुख (वय-32), जानकी रामदास जाधव (वय 32),रंगुबाई सीताराम देशमुख (वय-65), अनु रोहिदास देशमुख (वय 60), पार्वती पुंडलिक देशमुख (वय-65), लिलाबाई हरी देशमुख (वय-45), परिबाई भगवान देशमुख (वय-50), वंदना रोहिदास देशमुख (वय-26), चंद्राबाई काळू देशमुख (वय 65), प्रमिला चंदर भोये (वय 45), यमुना माधव जाधव (वय 40), श्रीराम लहानु चौधरी (वय 45), शेवंताबाई काशिनाथ गुंबाडे (वय 50), सर्व वाघधोंड येथील रहिवासी आहेत. सध्या सर्वत्र विवाह समारंभ असल्याने आनंदावर विरजण पडले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी हे करीत आहेत. चालक फरार झाला आहे.