नाशिक : विकलेल्या कांद्याचे पैसे मिळावेत म्हणून शेतकऱ्यांचे अनोखे उपोषण | पुढारी

नाशिक : विकलेल्या कांद्याचे पैसे मिळावेत म्हणून शेतकऱ्यांचे अनोखे उपोषण

देवळा, पुढारी वृत्तसेवा :  येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर सोमवारी (दि .२) रोजी उमराणा बाजार समितीत विकलेल्या कांद्याचे पैसे मिळावेत म्हणून प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने राहुट्या टाकून अनोखे उपोषण केले. सायंकाळी उशिरा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन २०१७/१८ मध्ये उमराणा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी कांदा विकला होता. यानंतर नोटाबंदीचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ केली होती.

अंदाजे चार कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी अनेक वेळा बाजार समिती प्रशासन, पणन संचालक पुणे, सहकार मंत्री, यांच्या कडे लेखी पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. परंतू अद्याप कोणतीही थेट कारवाई करण्यात आलेली नाही. संबंधित व्यापाऱ्यांच्या मालमत्तेची जप्ती करुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे थकित पैसे अदा करण्यासंबंधी प्रशासन विभाग व सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून टाळाटाळ व दिरंगाई होत असल्याने व्यापाऱ्यांकडून आमचे पैसे मिळावेत यासाठी प्रहार शेतकरी संघटनेकडून राहुट्या टाकुन लक्षवेधी उपोषण करण्यात आले.

 कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणे येथील नोटबंदी काळातील व्यापा-यांकडील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळावेत, या मागणीसाठी भर पावसात कांदा उत्पादक शेतकरी राहुटी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष कॄष्णा जाधव , कार्याध्यक्ष दशरथ पुरकर ,उपतालुकाध्यक्ष हरी सिंग ठोके ,शेतकरी चिंधा सोनवणे ,दिलिप अर्जुन सोनवणे ,कडू मन्साराम देवरे ,जगन्नाथ सोनवणे,रामदास बागुल ,श्रावण रामभाऊ ्नवनाथ साळुंखे ,जिभाऊ वाघ, बिबाबाई जिभाऊ देवरे,यांसह कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने, राज्य संपर्क प्रमुख कुबेर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाट, देवळा बाजार समितीचे संचालक योगेश आहेर आदीनी उपस्थित राहुन पाठींबा दिला.

 जो पर्यंत व्यापाऱ्यांनी थकवले पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचे प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय दहीवडकर यांनी ठामपणे सांगितले. येत्या पंधरा दिवसांत जर शेतकऱ्यांचे पैसे नाही मिळाले तर मंत्रालयासमोर आंदोलन उभे करु असा इशाराही संजय दहीवडकर यावेळी दिला आहे.  यावेळी उमराणा,दहीवड,मेशी,डोंगरगाव, पिंपळगाव वाखारी परीसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button