

मुंबई : प्रेमसंबंध तोडणाऱ्या कुटुंबियांवरील रागातून एका तरुणावर परिचिताने चाकूने गळ्यावर आणि पोटावर वार करुन हल्ला केल्याची घटना चेंबूर परिसरात मंगळवारी घडली. संदीप यादव असे या तरुणाचे नाव असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सुरज ला आरसीएफ पोलिसांनी अटक केली.
याच पसिरात यातील 29 वर्षांचे तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. संदीप हा त्यांच्या बहिणीच्या नंदेचा मुलगा आहे. त्यांच्या भाचीचे अलीकडेच लग्न झाले होते. त्यांचे प्रेमसंबंध तोडून तिचे दुसरीकडे लग्न लावण्यास तिचे घरातील सर्वच मंडळी जबाबदार आहेत असा संशय सुरजला होता. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता.
याच रागातून मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजता त्याने संदीप यादववर प्राणघातक हल्ला केला होता. जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले होते. तसेच दोन ते तीन वेळा चाकूने पोटात भोसकले होते. त्यात संदीप हा गंभीररीत्या जखमी झाला होता.
या हल्ल््यानंतर सुरज तेथून पळून गेला होता. रक्तबंबाळ झालेल्या संदीपला त्याच्या नातेवाईकासह स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या गळ्यावर आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.
या घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदाराच्या जबानीवरुन पोलिसांनी सुरज कांबळे याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यानंतर पळून गेलेल्या सुरजला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.