

मुंबई: हिंदू सण साजरे करताना कोणताही आवाज बंद होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात बोलताना मांडली असून त्यामुळे ध्वनिप्रदूषणाच्या विषयाला नव्याने तोंड फुटले आहे.
ध्वनिप्रदूषणामुळे राज्यात डीजेवर बंदी घातली जावी, अशी मागणी पुण्यातील विद्यानंद बापट यांनी मांडली आहे. त्या विधानाचा समाचार घेताना गृह राज्यमंत्री कदम यांनी हिंदू सण, उत्सव हे परंपरेनुसार आणि उत्साहात साजरे होणारच, असे म्हटले आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ‘डीजे’विरोधात मत मांडले आहे.
सण आणि उत्सवांमध्ये सुरू झालेल्या ‘डीजे’सारख्या काही चुकीच्या पद्धती एकदम बंद करता येत नाहीत, असे मत व्यक्त करून लोकसहभागातून ‘डीजे’चे स्तोम कमी करावे लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
पारंपरिक पद्धतीने आणि कमीत कमी ध्वनिप्रदूषण करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. त्या भूमिकेला छेद देणारी भूमिका गृह राज्यमंत्री कदम यांनी मांडल्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मुंबई, नवी मुंबई, सोलापूर, नागपूरसारख्या शहरांमध्ये तेथील पोलीस आयुक्तांनी डीजेवर बंदी आणल्यानंतर योगेश कदम यांनी हे वक्तव्य केले आहे