

पुढारी ऑनलाईन डेस्क : कधी तरी लक्षात घ्या की, आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंतराव पाटील यांना लगावला. माझ्यावर अजितदादांचे लक्ष आहे. या जयंतरावांच्या विधानावर पण तुम्ही प्रतिसाद देत नाहीत, असा मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली.
महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची आज सोमवारी विधानसभेत एकमतीने निवडीची घोषणा करण्यात आली. यानंतर पवार बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेकजण स्टेजवर संविधान हातात घ्यायचे, मग ज्यांच्या हाती संविधान नाही, त्यांना आदर नाही का ? असा सवाल करत अनेकांनी संविधानातील तरतुदी वाचल्याच नाहीत, असे ते म्हणाले.
सदस्यांनी स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणे क्रमप्राप्त आहे, मग विरोधकांची भूमिका नियम बाह्य नाही का ? उगीच काही तरी स्टंटबाजी केली जात आहे. ईव्हीएमविरोधात मारकडवाडी ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनावर पवार यांनी टीका केली.
आमची बाजू खरी आहे, हे नागपूर अधिवेशनात दाखवून देईल. लोकसभेत आमच्या जागा कमी आल्या, तेव्हा आम्ही रडलो नाहीत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 31 जागा निवडून आल्या तेव्हा ईव्हीएम गारगार वाटत होतं, आता गार वाटतंय की गरम ते तुमचं तुम्हीच बघा, असा निशाणा ईव्हीएम आरोपांवरून त्यांनी विरोधकांवर साधला.