

मुंबई : शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने गर्दीची २५ रेल्वे स्थानके आणि रेल्वे इमारतींना सौरऊर्जा केंद्रांमध्ये रूपांतरित केले आहे. यामध्ये वसई, विरार, दादर, बोरिवली, मीरा रोड, नंदुरबार, वापी, चलथान अशा स्थानकांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे दरवर्षी १.१२ कोटी युनिट्सहून अधिक वीज निर्मिती होऊन सुमारे १३.४ कोटींची बचत होणार आहे.
उपनगरीय रेल्वेचे दैनंदिन प्रवासी ३५ लाख आहेत. संपूर्ण सौर नेटवर्कमधून दरवर्षी १ कोटी युनिट्सपेक्षा जास्त हरित वीज निर्माण होण्याची अपेक्षा आहे. मुंबई विभागाची सौरऊर्जा क्षमता ८५३२ केडब्ल्यूपी असून वार्षिक वीज निर्मिती १.१२ कोटी केडब्ल्यूपी आहे. त्यामुळे १३: ४ कोटीची वार्षिक बचत झाली आहे. २०२५-२६ मध्ये वाढवलेली सौर ऊर्जा क्षमता ही २६०७ केडब्लूपी आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार सौरऊर्जा हा केवळ पर्यावरणाशी संबंधित उपक्रम न ठेवता पश्चिम रेल्वेने स्थानकाच्या छतांवर आणि फलाटांवरील शेड्सवर सौर पॅनेल बसवले आहेत. त्यामुळे स्थानकांवर उपल्बध होणारा मुबलक सूर्यप्रकाशाचे विजेत रूपांतर होणे शक्य झाले आहे.
ही निर्माण झालेली वीज रेल्वेच्या विविध यंत्रणांसाठी वापरली जाते आहे. त्यामुळे पारंपरिक ग्रीड विजेवरील अवलंबित्व कमी होत असून विजेची बिलेही कमी होत असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने म्हणणे आहे.
सौरऊर्जेमुळे बचत अशी होते
उपनगरीय स्थानके
सौरऊर्जा क्षमता : १६०८ केडब्लूपी
वार्षिक वीज निर्मिती: २१.१३ लाख युनिट्स
वार्षिक बचत : २.५३ कोटी रुपये
उपनगराबाहेरील स्थानके
सौरऊर्जा क्षमता: ९९९ केडब्ल्यूपी
वार्षिक बचत: १.५७ कोटी
सौरऊर्जमुळे रेल्वेला होणारे फायदे
रेल्वेचा वीज खर्च कमी होतो.
स्थानकांत स्वच्छ ऊर्जेचा वापर
पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होणार
रेल्वे परिसरात कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मिळणार मदत.
वार्षिक वीज निर्मिती: १३.१३ लाख युनिट्स
सौरउर्जेवर चालणारी स्थानके आणि त्यांची वार्षिक बचत
वसई - ५९.१३ लाख
विरार - २७.५९ लाख
दादर - २४.१३ लाख
बोरिवली - २३. ८१ लाख
मीरा रोड १९.७१ लाख
गोरेगाव - १५.७७ लाख
कांदिवली - १५.७७ लाख
माटुंगा रोड - १५.७७ लाख
महालक्ष्मी - १५.७७ लाख