

मुंबई; वृत्तसंस्था : वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकालगतच्या गरीबनगर भागात सुरू असलेल्या रेल्वेच्या मोठ्या अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान बुधवारी अचानक परिस्थिती अत्यंत चिघळली. रेल्वे आणि पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केल्याने याचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले.
संतप्त जमावाने कारवाई रोखण्यासाठी पोलीस आणि रेल्वे कर्मचार्यांच्या दिशेने थेट दगडफेक सुरू केली. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज केला. या राड्यामुळे परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, वांद्रे स्थानक परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या आणि दंगल नियंत्रण पथकाला घटनास्थळी पाचारण केले आहे.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई कोणत्याही स्थितीत थांबणार नाही. पुढील तीन ते चार दिवस कडक बंदोबस्तात उर्वरित सर्व बेकायदेशीर बांधकामे पाडली जातील.