

मुंबई : विधान परिषदेच्या 17 जागांसह राज्यसभेच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार अखेरचा दिवस आहे. जागावाटपावरून महायुतीत निर्माण झालेला तिढा रविवारी सुटला. महायुतीत भाजपच्या वाट्याला 11, शिवसेना शिंदे गटाला 4 आणि अजित पवार गटाला 2 जागा मिळाल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीने दोन दिवसांपूर्वीच आपले जागावाटप जाहीर केले होते. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना ठाकरे गट 4 व शरद पवार गट 3 जागा लढविणार आहे; तर नाशिक आणि नांदेड या दोन जागांवरील तिढा कायम आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या 17 जागांच्या निमित्ताने गेले 15 दिवस राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. अधिकाधिक जागा लढविण्याचा भाजपचा आग्रह होता. मित्रपक्ष शिंदे गट 7 जागांसाठी आग्रहीहोता. त्यासाठी राज्यातील वाटाघाटीनंतर शिंदे यांनी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा केली. मात्र, या वाटाघाटीनंतर शिंदे गटाला चार जागांवर समाधान मानावे लागले. ठाणे, नाशिक, परभणी-हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघांचा समावेश आहे. शिंदे यांचा बालेकिल्ला ठाण्यासाठी कोकणच्या जागेवरील दावा सोडावा लागला.
रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे
या बदल्यात रायगडचे पालकमंत्रिपद शिंदे गटाच्या पदरात पडल्याचे सांगितले जात आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना या एका जागेवर भाजप आणि शिंदे गटात शेवटपर्यंत रस्सीखेच झाली. ती जागा भाजपच्या वाट्याला आली आहे.
पुणे मतदारसंघ खेचण्यात राष्ट्रवादीला यश
तीन जागांचा आग्रह धरणार्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला पुणे व रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे.
महाआघाडीत पुणे राष्ट्रवादीकडेच : महाविकास आघाडीतील जागावाटपामुसार काँग्रेसच्या वाट्याला नागपूर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड हे मतदारसंघ आले आहेत; तर शिवसेना ठाकरे गट रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना या जागा लढविणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुणे, ठाणे आणि सांगली-सातारा हे मतदारसंघ सुटले आहेत. मात्र नांदेड आणि नाशिक या दोन मतदारसंघांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
असे ठरले जागावाटप
भाजप : नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि सातारा-सांगली.
शिवसेना (शिंदे गट) : ठाणे, नाशिक, परभणी-हिंगोली आणि यवतमाळ.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : पुणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग.
सोलापूर, सांगली-सातारा भाजपकडे
महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला 11 जागा आल्या आहेत. राज्यातील बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भाजपचे प्राबल्य आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या माध्यमातून विधान परिषदेतील आपले संख्याबळ अधिक करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपच्या वाट्याला आलेल्या 11 जागांमध्ये नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि सातारा-सांगली या मतदारसंघांचा समावेश आहे.