

नरेश कदम
मुंबई : 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे जर काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी केली असती तर आज ठाकरे बंधूंसह काँग्रेसची मुंबई महापालिकेत सत्ता आली असती. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह भाई जगताप अशा काँग्रेस नेत्यांचा स्वबळाचा हट्ट पक्षाला चांगलाच नडला, तसेच ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेच्या सत्तेचा वारू काँग्रेस नेत्यांच्या हट्टामुळे रोखला गेला, हे निवडणूक निकालावरून स्पष्ट होत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला चांगले यश आले होते. पण केवळ उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी युती करताच वर्षा गायकवाड, भाई जगताप या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यामुळे उत्तर भारतीयांची मते काँग्रेसला मिळणार नाहीत, अशी भीती काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे व्यक्त केली. तसेच प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मनातही ठसविले. मुंबईत लोकसभेप्रमाणे आघाडी एकसंध राहिली पाहिजे, असे शरद पवार यांनी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना बोलावून समजावले. पण मुंबई काँग्रेसच्या नेत्यांचा निर्णय आधीच झाला होता. मुस्लिम आणि दलित मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडेल, असा धोका मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना सांगण्यात आला जगताप आणि गायकवाड हे नेते स्वबळाची भाषा करत राहिले. ठाकरे राहुल गांधी यांच्याशी बोलले. पण काही झाले नाही.
स्वबळावर लढून 24 च्या आसपास काँग्रेस राहिली. 2017 मध्ये त्यांचे 31 नगरसेवक होते. मुस्लिम मतांचे उद्धव ठाकरे गट, सपा, एमआयएम, काँग्रेस यांच्यात विभाजन झाले. एमआयएमने काँग्रेसच्या काही जागा खेचल्या. मनसेमुळे भाजपविरोधी उत्तर भारतीयांची मते काँग्रेसला मिळणार नाहीत असा बाऊ केला. त्यांची मते काँग्रेसला मिळाली नाहीच. ही मते भाजपला पडली. एकसंध आघाडी असती तर आघाडीची सत्ता मुंबईत आली असती.