मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कसारा, कर्जत आणि पनवेल उपनगरीय रेल्वे मार्गावर अत्याधुनिक कवच प्रणाली ४.० बसविण्यात येणार आहे. कवच ४.० ला भारतीय रेल्वेच्या संशोधन रचना आणि मानक संस्थेने (आरडीएसओ) जुलै महिन्यात मंजुरी दिली होती. याकरिता १४० कोटी रुपयांची निविदा काढली आहे. येत्या दोन महिन्यात ही प्रणाली बसविण्यास सुरुवात करण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे.
गेल्या काही दिवसांपासून रेल्वेचे वाढते अपघात लक्षात घेता रेल्वेने उपनगरीय लोकलसह मेल-एक्सप्रेसचा प्रवास सुरक्षित करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपनगरीय रेल्वे मार्गावर देखील कवच प्रणाली राबविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या मार्गासह उपनगरीय रेल्वे मार्गावर कवच प्रणाली बसविण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे विभागातून काम सुरु करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत काम सुरु करुन पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही प्रणाली स्थापित करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. पुणे आणि सोलापूर विभागातही एकाच वेळी काम सुरू करण्यात येणार आहे. मुंबईसह तिन्ही विभागांसाठी सुमारे ३५० कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रत्येक स्थानकावर ट्रॅकवर RFID टंग बसवणे, ट्रॅकच्या बाजूने ऑप्टिकल फायबर केबल टाकणे, विभागात दूरसंचार टॉवर बांधणे आणि प्रत्येक लोकोमोटिव्हमध्ये उपकरणे यांचा समावेश असेल.
कवच ४.० आवृत्ती ही भारतीय रेल्वेसाठी सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले जाते. कारण त्यात विविध रेल्वे नेटवर्कसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश आहे. कवच ही स्वदेशी विकसित ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) सिस्टीम असून अत्याधुनिक तंत्रज्ञान-केंद्रित प्रणाली आहे.
कवच प्रणाली ब्रेकचा स्वयंचलित वापर करून निर्दिष्ट वेग मयदित ट्रेन चालवण्यास लोको पायलटला मदत करते आणि खराब हवामानात ट्रेनला सुरक्षितपणे धावण्यास मदत करते. मार्गावर ट्रेनची टक्कर होण्याची शक्यता कमी करण्यास मदत करते. भविष्यात १६० किमी प्रतितास सेमी हाय-स्पीड ट्रेन चालवण्यासाठी पश्चिम रेल्वे सध्या मुंबई-दिल्ली कॉरिडॉरवर कवच ३.२ प्रणाली राबवित आहे.