रिगल जंक्शन परिसर व काळाघोडा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. या परिसरात महत्वाच्या सरकारी तसेच खासगी आस्थापना आहेत. त्यामुळे वाहतुकीचे प्रमाण वाढलेले असून परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीत बदल केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रिगल जंक्शन आणि काळाघोडा परिसरात सकाळी-संध्याकाळी वाहतुकीची कोंडी होत आहे.
त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना देखील बराच वेळ वाहतूककोंडीत अडकून पडावे लागत आहे. परिणामी, वेळ आणि इंधनाचाही अपव्यय होत आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस (काळा घोडा जंक्शन) महात्मा गांधी रोड (उत्तर वाहिनी) वरून के. दुभाष मार्गावर जाण्यासाठी उजवे वळण तात्पुरते बंद करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहनचालकांनी महात्मा गांधी रोड (उत्तर वाहिनी) के. दुभाष मार्गावर उजवे वळण न घेता सरळ काळाघोडा जंक्शन-डावे वळण ओ. डीमेलो मार्ग प्रेमलाबाई चौक-उजवे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग-उजवे वळण युनिव्हर्सिटी मार्ग-उजवे वळण महात्मा गांधी मार्ग काळाघोडा जंक्शन डावे वळण-के. दुभाष मार्गावरून प्रवास करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.