मुंबई : सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री म्हणून फडणवीस सरकारच्या काळात राबविलेल्या महत्त्वाकांक्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही, असे सांगत यासंदर्भात नेमलेल्या तदर्थ समितीने मुनगंटीवारांना क्लीन चिट दिली आहे. तसेच, या अभियानांतर्गत राज्यभरात तब्बल ५२ कोटी वृक्षांची लागवड झाल्याचेही समितीने म्हटले आहे. मात्र, अशा अभियानांसाठी लहान रोपटे न लावता, २-३ वर्षांची व ७ ते १० फूट उंचीची झाडे लावण्याची शिफारसही समितीने अहवालात केली आहे. (Sudhir Mungantiwar)
आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात या मोहिमेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले. त्यानुसार तत्कालीन वनमंत्री दत्ता भरणे यांनी वृक्षलागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समितीची घोषणा केली होती. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला.
समितीने आपल्या अहवालात या मोहिमेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वी झाल्याचे समितीचे स्पष्ट मत आहे. या अभियानासाठीची आर्थिक तरतूद, त्यासाठी झालेला खर्च, रोप निर्मिती आणि खरेदी, त्यासाठीची खरेदी प्रक्रिया, रोपांची लागवड, जिवंत रोपांची टक्केवारी यांसह संपूर्ण अभियानाच्या अंमलबजावणीत अनियमतता अथवा गैरव्यवहार झाला नसल्याचे समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. अहवालानुसार राज्यात तब्बल ५२ कोटी वृक्ष लागवड झाली आहे. ही राज्याच्या पर्यावरणाच्यादृष्टीने जमेची बाजू आहे. Sudhir Mungantiwar
त्याचवेळी राज्यात दरवर्षी उद्दिष्ट ठरवून वृक्ष लागवड करणे आवश्यक असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. लहान रोपटे नको, थोडी मोठी झाडे लावा भविष्यात अशा अभियानांसाठी लहान रोपट्यांची लागवड करू नये. लहान रोपट्यांची निगा जास्त राखावी लागते. तसेच, जनावरांपासून संरक्षण, कुंपणासाठी अधिकचा खर्च होतो. हे टाळण्यासाठी २ ते ३ वर्षांची व ७ते १० फूट उंचीची झाडे लावल्यास देखभाल व खर्च दोन्ही कमी करण्यास मदत होईल, अशी शिफारस समितीने केली आहे.