

कोपरखैरणे: रबाळे वाहतूक शाखेच्या हद्दीत ठाणे-बेलापूर रोड ते ऐरोली-काटई नाका रोड असे एमएमआरडीएतर्फे पुलाचे काम सुरू आहे. ठाणे-बेलापूर रोडवर भारत बिजली, सिमेन्स कंपनीजवळ पुलावर गर्डर्स टाकण्याचे काम टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. 27 मे ते 4 जूनपर्यंत एकूण 14 दिवस रात्रपाळीत हे काम करण्यात येणार आहे.
यासाठी 27 मे रोजी रात्री अकरा ते 4 जून रोजी पहाटे 6 वाजेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संबधित रस्ता तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे. सदर कामाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व प्रवाशांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
त्यानुसार कामाच्या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांकरीता (सदर कामाचे अनुषंगाने असणारी एमएमआरडीएची वाहने वगळून) बंदी घालण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग असे :
ठाणे-बेलापूर रोडवरील वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी मार्ग : 6 चाकी व त्यावरील सर्व वाहने ही मुकुंद कंपनी या ठिकाणाहून एमआयडीसीमधील आतील रस्त्याने इच्छित स्थळी जातील.
तसेच चारचाकी वाहने ही भारत बिजली चौकातून उजव्या बाजूने फायर ब्रिगेड चौकातून डावीकडून खेडेकर चौकात येऊन इच्छित स्थळी जातील.
बेलापूर येथून ठाण्याकडे जाणारी वाहने रबाळे नाका सिग्नल येथून उजव्या बाजूने एमआयडीसी आतमधील रस्त्याने मुकुंद कंपनी येथून इच्छित स्थळी जातील.
बेलापूर येथून पटणीमार्गे ठाणे येथे जाणारी वाहने रबाळे नाका दिवागाव सर्कलमार्गे पटणी ठाणे अशी इच्छित स्थळी जातील. (टी पॉईंट येथून डाव्या बाजूने)