

भिवंडी : राज्याला हादरवून सोडणाऱ्या टीईटी पेपरफुटीप्रकरणी भिवंडी सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यातील प्रकाश मिसाळ (रा. बीड) आणि अशोककुमार बाबूलाल शाव (रा. पाटणा बिहार) या दोन फरार आरोपींना अटक केली असून अटक आरोपींची संख्या आता १८वर पोहोचली आहे.
दोन्ही आरोपींना रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रकाश मिसाळ यास बीड येथून आणि अशोक कुमार शाव यास दिल्ली येथून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी प्रकाश मिसाळ याला पुणे येथे भेटण्यासाठी कपिल आला होता. एका हॉटेलमध्ये या दोघांची भेट झाली होती. त्यावेळी टीईटी परीक्षेच्या पेपर संदर्भातील खरेदी-विक्रीबद्दल या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे तपासात समोर आले आहे. दुसरा आरोपी अशोककुमार शाव हा सोलापूर येथून अटक केलेल्या प्रकाश पवार याच्या संपर्कात होता. आता या दोन्ही आरोपींच्या चौकशीतून आणखी महत्त्वाची माहिती बाहेर येऊ शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे.