पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर चाकू हल्ला प्रकरणी दुर्ग येथून अटक करण्यात आलेल्या संशयित आकाश कैलाश कनौजियाला मुंबई पोलिसांनी सोडले आहे. दीर्घ चौकशीनंतर त्याचा या हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई पोलिसांनी संशयिताचा फोटो दुर्ग आरपीएफला पाठवला होता, ज्याच्या आधारे आकाश कैलाश कनौजियाला शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या जनरल बोगीतून ताब्यात घेण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत संशयित आकाश कैलाश कनोजियाची चौकशी केली. वांद्रे गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रदीप फंडे यांनी ANI शी बोलताना सांगितले की, आम्ही चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तो संशयित आरोपी नाही. आम्ही त्याला मुंबईला घेवून जाणार नाही. त्याला रेल्वे स्टेशनवर सोडणार आहोत.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर वांद्रे (पश्चिम) येथील घरी पहाटेच्या सुमारास चाकू हल्ला झाला. यात तो गंभीर जखमी झाला. यामुळे त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसला आणि त्याच्या घरातील कर्मचाऱ्याशी वाद घातला. यादरम्यान सैफने मध्यस्थी करून त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करत त्याला जखमी केले. ही घटना पहाटे २ ते २.३० च्या दरम्यान घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सैफच्या घरी त्याचे कुटुंबीय होते. सैफ अली खानला चाकूने ६ ठिकाणी भोसकल्याने त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अभिनेता सैफ अली खानच्या प्रकृतीविषयी माहिती देताना लीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले, "अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्यानंतर सैफ अली खानला पहाटे २ वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मणक्यात चाकू घुसल्याने त्याच्या पाठीच्या कण्याला मोठी दुखापत झाली. त्याच्या मणक्यात अडकलेल्या चाकू काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या डाव्या हाताला आणखी दोन खोल जखमा झाल्या आहेत. त्याच्या मानेला एक जखम झाली असल्याने त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. त्याची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे. तो आता बरा होत आहे आणि धोक्याबाहेर आहे."