

नवी दिल्ली: "अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांची अस्वस्थता स्वाभाविक आहे. अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत. त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या. तसेच पुढच्या महिन्याभरात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील," असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, अजित पवार यांचा अपघात की घातपात या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत, तर्कवितर्क लढवले जात आहेत. रोहित पवारांनीही मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार आपल्यात नाहीत या गोष्टीवर आजही विश्वास होत नाही. अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, हीच अस्वस्थता रोहित पवारांनी मांडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात चौकशी अंतिम सत्य समोर येईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहेत. पक्ष विलीनीकरण होणार का, कोणाच्या बैठका झाल्या कशा झाल्या, या सर्व प्रश्नांची उत्तरे यथावकाश मिळतील. महिनाभर थांबा, असे म्हणत त्यांनी विलीनीकरणाबाबतचे गूढ आणखी वाढवले. आज अजितदादा आपल्यात नाहीत. आमची चर्चा आमच्या दादासोबत झाली होती. आता त्यांच्यापश्चात कुटुंब अडचणींच्या काळातून चालले आहे. आम्ही यातून सावरत आहोत. त्यामुळे सध्याच्या चर्चेवर बोलून मला कोणाची उणीधुणी काढायची नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे पुणे जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन बैठकीला दिल्लीतून ऑनलाईन उपस्थित होत्या. या बैठकीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, सुमित्रा पवार आणि मी यापूर्वीही या बैठकीला एकत्र होतो मात्र त्यावेळी त्या वेगळ्या भूमिकेत होत्या, आज वेगळ्या भूमिकेत आहेत. अजित दादांच्या खुर्चीवर त्यांना बघून एका डोळ्यात दुःख आणि एका डोळ्यात आनंद आहे. अजित पवारांच्या जाण्याचे दुःख कधीही भरून न निघणारे आहे. दादांचे स्वप्न पूर्ण होवोत, एवढीच आमची इच्छा आहे. दरम्यान, ही बैठक संसदेचे अधिवेशन सुरू असताना घेतली जाऊ नये. प्रत्यक्ष उपस्थित राहून अनेक प्रश्न मांडता येतात.
शरद पवारांची प्रकृती उत्तम असून त्यांना काही दिवस विश्रांती करण्यासाठी सुचवले आहे. त्यांची विचारपूर करण्यासाठी अनेकांचे फोन आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि अनेक लोकांचे फोन आले, त्या सर्वांची मी आभारी आहे, असेही त्या म्हणाल्या.
तर मामांनी केली असती लग्नाची घोषणा
सुप्रिया सुळे त्यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाले की, रेवतीच्या लग्नाची घोषणा आम्ही ३० जानेवारीला करणार होतो मात्र अजित पवारांच्या निधनामुळे ती करू शकलो नाही. अजित पवार असते तर त्यांनीच मामा म्हणून भाचीच्या लग्नाची घोषणा केली असती असेही त्या म्हणाल्या.