

Sunetra Pawar Emotional: मुंबईत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज विधान भवनात नुतन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच संबोधन केलं. त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बोलताना महाराष्ट्र सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणत्या योजना राबवत आहोत याची माहिती दिली. या संबोधनाच्या शेवटी त्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना भावून झाल्या. यावेळी त्या बहिणाबाई चौधरी यांच्या 'अरे संसार संसार' या कवितेच्या ओळींचा अर्थ खूप खोल आहे असं म्हणाल्या. सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहून शेजारी बसलेल्या आदिती तटकरे यांना देखील अश्रू अनावर झाले.
विधान भवनात आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपले पहिले संबोधन केलं. त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी राज्य सरकार महिलांसाठी कोण कोणत्या योजना राबवत आहे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणती पावलं उचलत आहे याची माहिती दिली.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी आमचे सरकार हे महिलांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहे. राज्यातील बेपत्ता मुलींना शोधण्यासाठी ऑपरेशन मुस्कान राबवलं जातं अशी माहिती दिली. तसेच त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखील प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. महिलांच्या पोषणाबाबत देखील बोलताना त्यांना महिलांच्या पोषण आहारात योग्य तो बदल करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
सुनेत्रा पवार यांनी आज सभागृहातून लवकर या लवकर जा या योजनेची देखील घोषणा केली. याद्वारे मुंबईतील शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष संकल्पना राबवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच त्यांनी राज्यातील सर्व १७ हजार अंगणवाडींसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार असल्यांच देखील सांगितलं.
सुनेत्रा पवार यांनी मोठी घोषणा करत केंद्राच्या धरतीवर राज्यातील महिलांना देखील १८० दिवसांची प्रसुती रजा देण्यात येईल असं जाहीर केलं. तसेच त्यांनी शेतकरी महिलांसाठी लवकरच धोरण तयार करण्यात येईल अशी माहिती दिली. त्यांनी शक्ती कायदा लवकरात लवकर संमत व्हावा यासाठी शासन दरबारी आग्रही राहणार असल्याचं देखील सांगितलं.