

मुंबई : महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाऊंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाऊंडेशन सोबत झालेल्या करारामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, तसेच नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य, पोषण, पाणी सुरक्षा आणि उपजीविका सुधारणे याला शासनाचे प्राधान्य आहे. या भागीदारींमुळे विविध कल्याणकारी शासकीय योजना अधिक लोकोपयोगी होण्यास मदत होणार आहे. शासनाच्या योजना लोक चळवळीच्या स्वरूपात पुढे येत आहेत. टाटा ट्रस्टचे सहकार्याने विविध विभागांच्या माध्यमातून सकारात्मक प्रभाव पाडण्यात यशस्वी होऊ. समाजातील सर्व घटकात उत्पन्न वाढून जगण्याचा स्तर उंचावण्यास यामुळे निश्चितच मदत होईल.
टाटा ट्रस्टस्चे अध्यक्ष नोएल टाटा म्हणाले, महाराष्ट्र शासनाशी भागीदारी करून आरोग्य, शिक्षण, पोषण, उपजीविका, पाणी आणि स्वच्छता कार्यक्रमांमध्ये सुसूत्रता आणणार आहे. सर्व सामन्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न राहणार आहे. शासनाचे विविध विभाग आणि समुदायांसोबत सकारात्मक परिणाम आणण्याचा हेतू असणार आहे. शासन व टाटा ट्रस्टस् यांनी गुरुवारी (दि. 12) राज्याच्या एकात्मिक विकासाला पाठबळ देण्यासाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून धोरणात्मक भागीदारी अधिकृत केली आहे. नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनीही शासनासोबत जलसंधारण क्षेत्रात काम करण्यास मदत मिळत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
टाटा ट्रस्टच्या सोबतच्या करारात ग्रामविकास, जलसंधारण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, गडचिरोली जिल्हा प्रशासन, मुख्यमंत्री सहायता निधी, नागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्था, अ. भा. आयुर्विज्ञान संस्था, मध्य भारत आयुर्विज्ञान संस्था, केअर हॉस्पिटल, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन, मिदास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश आहे. तसेच नाम फाऊंडेशनचा जलसंधारण विभागासोबत करार करण्यात आला आहे.
माता, नवजात बालक, बालक व किशोरवयीन मुलांसाठी आरोग्य सेवा बळकट करणे
टेलिमेडिसिनसह इतर माध्यमांतून उपचार सहज देणे, शहरी व दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य सेवा
एकात्मिक आपत्कालीन व्यवस्थापन सेवाद्वारे उत्तम आपत्कालीन प्रतिसादास पाठबळ देणे.
दोन वर्षांखालील मुलांमधील खुंटलेली वाढ, कमी वजन आणि कुपोषण रोखण्यास मदत करणे
गडचिरोली सारख्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून ‘टेक-होम रेशन’ सारख्या योजनांचे वितरण
तलावांचे पुनरुज्जीवन, जलकुंभ आणि नद्यांमधील गाळ काढणे, भूजल पुनर्भरण सुधारणे
मराठवाडा-विदर्भासह पाणीटंचाईग्रस्त भागांवर भर देऊन मृद व जलसंधारण योजनांची अंमलबजावणी