मुंबई : सायन रेल्वे उड्डाणपुलाचे काम महिनाभर पुढे ढकलले असून हे काम आता 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने शुक्रवारी स्थायी समितीत दिले. त्यामुळे अजून काही दिवस रेल्वे प्रवाशांसह वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.
सायन उड्डाणपुलाच्या अतिरिक्त कामाबद्दलचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला असता समिती सदस्यांनी कोणाचे काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा केली. समिती सदस्य राजश्री शिरवडकर यांनी काम सुरू असताना प्रवाशांच्या सुरक्षेतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. तर तुलिफ मिरांडा यांनी अतिरिक्त कामाची पुलाचे कंत्राट देताना गरज नव्हती का,
असा सवाल केला. अन्य सदस्यांनी पुलाच्या कामामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. यावर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा यांनी अतिरिक्त कामामुळे पुलाचे काम काही दिवस रखडले असले तरी 15 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे स्पष्ट केले.
पश्चिम व पूर्व उपनगरात जाणाऱ्या वाहनचालकांना अजून काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. त्याशिवाय रेल्वे स्टेशन येथे उतरणाऱ्या प्रवाशांनाही अजून 5 महिने त्रास सहन करावा लागणार आहे. सायन उड्डाणपुलाजवळील पादचाऱ्यांसाठी पूर्व - पश्चिम पादचारी पूल कार्यान्वित करण्यात आला आहे. दोन भूयारी पादचारी मार्गांपैकी एक भूयारी मार्ग पूर्ण झाला असून तो लवकरच खुला होणार आहे. उर्वरित पुलाचे काम 15 जुलैपर्यंत पूर्ण होईल, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले होते.