

मुंबई: शिंदे शिवसेनेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या दोन उमेदवारांबद्दल हालचाली वाढल्या आहेत. बच्चु कडू यांनी प्रहार जनशक्ती हा पक्ष शिवसेनेत विलीन करायचा निर्णय घेतला तर त्यांना संधी द्यावी ही मागणी जोर धरते आहे. त्यातच काही नवीन नावे समोर आली आहेत.
मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक असताना थेट मातोश्रीला धक्का देत शिंदे यांचा समवेत आलेल्या शीतल म्हात्रे व डॉ. दीपक सावंत यांना संधी द्या अशी मागणी पुढे आली आहे. पक्ष संघटना बांधणाऱ्या मंडळींना भारतीय जनता पक्ष झुकते माप देत असेल तर शिवसेना शिंदे गटानेही संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या संजय मोरे यांच्या नावाचा विचार करावा असाही प्रस्ताव समोर आला आहे.
बच्चू कडू यांनी पक्षविलीनीकरणाचे आश्वासन दिले तर उमेदवारी द्यावी अशी भावना पुन्हा एकदा जाहीरपणे बोलून दाखवली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही मातोश्रीला झुगारले होते. याची दखल घेत निश्चितच न्याय मिळेल अशी भावना सुमारे अर्धा डझन शिंदे समर्थक व्यक्त करीत आहेत. शिंदे न्याय देतात, संधीही देतात. त्यामुळे आमच्यावर अन्याय होणार नाही असा विश्वास ही मंडळी व्यक्त करीत आहेत.
पक्ष व चिन्ह शिंदे यांना मिळेल याची खात्री नव्हती तरीही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा एकनाथ शिंदे चालवू शकतील या विश्वासामुळे आम्ही त्यांच्या समवेत आलो आहोत. माजी आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांना विधान परिषदेसाठी शब्द दिला गेला होता असे त्यांचेही म्हणणे असल्याचे समजते.
१० जागांसाठी १२ मे रोजी मतदान विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या वाट्याला नऊ, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता आहे. विधान परिषदेतील नऊ सदस्यांची मुदत १३ मे रोजी संपत आहे. या नऊ जागा व प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली एक, अशा १० जागांसाठी १२ मे रोजी निवडणूक आहे.
यासाठी ३० एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. भाजपकडून प्रज्ञा सातव यांना पुन्हा उमेदवारी देणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. उर्वरित जागांसाठी संख्याबळानुसार भाजपला पाच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता आहे.
भाजपच्या उमेदवारीनंतर ठरणार शिंदे यांचे उमेदवार बच्चू कडू यांना संधी देण्यास भारतीय जनता पक्षाचा विरोध आहे काय अशी शक्यताही शिंदे गटाकडून आज चाचपडून पाहिली जात होती. यावेळी दोन उमेदवार निवडून येणार आहेत. हे सहज सोपे असल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे.
भारतीय जनता पक्ष नेमकी कोणाला संधी देणार याकडे युतीतील दोन्ही पक्ष लक्ष ठेवून आहेत. भाजपच्या ज्या नावांना पुढे जा असे आदेश येतील, त्यानुसार शिंद गट आपली नावे अंतिम करेल असेही मानले जाते आहे. बच्चू कडू हे नाव महत्वाचे असल्याने त्यांच्या नावाचा फेरविचार होणार नाही असेही सांगितले जात आहे.