मुंबई : महायुतीतून लढायचे की स्वबळावर लढायचे, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात गोंधळ सुरू असताना, त्यांच्या गटाचे काही आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. मात्र, या आमदारांना पवार यांनी अद्याप 'वेटिंग'वर ठेवले आहे. त्यामुळे घरवापसीसाठी इच्छुक हे नेते संभ्रमात पडले आहेत.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे आठ खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. यातील अनेक आमदारांनी आतापर्यंत शरद पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार गटासोबत भाजपमध्ये असलेले जुने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचाही यात समावेश आहे. अतुल बेनके, नरहरी झिरवाळ, चेतन तुपे, मधुकर पिचड, भाजपचे हर्षवर्धन पाटील, राजेंद्र शिंगणे या नेत्यांनी शरद पवार यांच्या अनेकवेळा भेटी घेतल्या आहेत. यात झिरवाळ आणि मधुकर पिचड हे आपल्या चिरंजीवांसाठी प्रयत्न करत आहेत. श्रीगोंदा मतदारसंघात शरद पवार यांनी राहुल जगताप यांना कामाला लागा, असे सांगितले आहे. मात्र, अन्य कुणालाही त्यांनी शब्द दिलेला नाही.
अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे या चार नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पक्षात घेणार नाही, असे शरद पवार आपल्या मर्जीतील लोकांशी बोलले आहेत. राष्ट्रवादी फोडण्यात हे चार नेते अग्रभागी होते, त्यामुळे त्यांच्यावर पवारांचा राग आहे. या आमदारांनी पवारांकडे उमेदवारी मागितली आहे. पश्चिम महाराष्ट्रात जास्त जागा लढविण्याची पवारांची रणनीती आहे. त्यामुळे या भागातील आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. तथापि, त्यांनी कोणालाही शब्द दिलेला नाही. शरद पवार स्वतः उमेदवारांची निवड करत आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील काही चेहरे पवारांनी हेरले आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच शरद पवार आपले पत्ते उघड करणार आहेत.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील कथित गैरव्यवहारप्रकरणी सध्या जामिनावर असलेले मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये भेट घेतली. या भेटीत त्यांनी पवार यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते.