

मुंबई : घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या विकासकांच्या मालमत्तेवर टाच आणली जाईल. त्यासाठी विविध सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून विकासकाच्या मालमत्तेची माहिती गोळा करावी. विशेष अभियान राबवत अशा मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिऱ्यांना देण्यात आल्याची माहिती प्रभारी मंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी दिली.
घर खरेदीदारांची विकासकाकडून 792 कोटींची फसवणूक झाली. महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) घर खरेदीदारांच्या नुकसानभरपाईपोटी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याबाबतचा प्रश्न अतुल भातखळकर यांनी मांडला. त्यावर, प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना सांगितले की, महारेराच्या प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यात येत आहे.
तक्रारदारांच्या नुकसान भरपाईच्या अनुषंगाने विकासकाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले आहेत. तथापि, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लिलाव यशस्वी न होणे, प्रॉपर्टी आढळून न येणे, बँकेत प्रॉपर्टी तारण असणे, न्यायालयीन स्थगिती आदी विविध कारणांमुळे काही आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे. तथापि, या संदर्भात प्राधिकरणाने संबंधित जिल्हाधिकारी यांना आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत, असे देसाई यांनी सांगितले.