

पुढारी ऑनलाईन डेस्क : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. महामार्गाविरोधात बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आज (दि. १२) मुंबईतील आझाद मैदानातून धडक गळफास मोर्चा काढला. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या असून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यावर आम्ही ठाम असून आमची लढाई आम्हीच लढणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. (Shaktipeeth Highway Protest)
यापुढे जिल्ह्याव्यापी मेळावे घेण्यात येणार असून दि. ८ एप्रिलला मराठवाडा विभागीय मेळावा घेण्यात येणार आहे. १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा दिला आहे. यावेळी महामार्ग शक्ती विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे, माजी आमदार के पी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शेती वाचवा देश वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा आशयाच्या टोप्या शेतकऱ्यांनी परिधान केल्या होत्या. (Shaktipeeth Highway Protest)
हजारो शेतकऱ्यांचा विरोध असताना शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारचा अट्टहास का? डबल ढोलकी सरकार असून लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने आपली भूमिका बदलली. सरकारने शेतकऱ्यांना फसवले असून आपल्या पद्धतीने महामार्गाचे अलायमेंट बदलू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी समृद्धी महामार्गची श्वेतपत्रिका काढावी. शेतकरी जमीनच द्यायला तयार नाहीत, असे असताना शेतकऱ्यांची इच्छा नसताना महामार्गाचे काम सरकार पुढे रेटत आहे, अशी टीका यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.