

Sanjay Raut on Bageshwar Baba controversy
मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या ऊर्जेचा अखंड प्रवाह आहेत. ते कधी थकले नाहीत आणि कधी झुकले नाहीत. मात्र, सध्या काही 'बुवा' महाराष्ट्रात येऊन नवीन इतिहास लिहितायत किंवा तो बदलण्याचा प्रयत्न करतायत, हे महाराष्ट्राला कदापि सहन करणार नाही. फडणवीसांनी बागेश्वर बाबांना रोखायला हवं होतं, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत व्यासपीठावर उपस्थित होते. तेथे शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड केली जात होती. ज्यांना इतिहासाचं भान असायला हवं, अशा प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत शिवरायांचा अपमान होत असताना त्यांनी बागेश्वर बाबांना रोखायला हवं होतं. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, अशा महापुरुषाला तुम्ही थकलेला माणूस म्हणता? हे विधान जाणीवपूर्वक केलं जातंय," असा आरोप राऊत यांनी केला.
बागेश्वर बाबा स्वतः ब्रह्मचारी आहात आणि दुसऱ्यांना चार मुलं जन्माला घालायला सांगताय. आधी तुम्ही सुरुवात स्वतःपासून करा. हिंदुत्वाच्या नावाखाली असा प्रचार करणे हे भाजपचे खूळ आहे. एका बाजूला सरकार लोकसंख्या नियंत्रणावर कोटी रुपये खर्च करते आणि दुसरीकडे हे प्रचारक लोकसंख्या वाढवायला सांगतायत. प्रत्येक घरातील एक मूल भारतीय सैन्यात दाखल व्हावं, असं हे बाबा का बोलत नाहीत?, असा सवालही राऊत यांनी केला.
आम आदमी पक्षातील फूट हे ऑपरेशन लोटस नसून 'ऑपरेशन डरपोक' आहे. ईडीच्या धाडींना घाबरून जे पळून जातात, त्यांना निष्ठा नसते. महाराष्ट्रातही हेच झालं. अजित पवार असोत की एकनाथ शिंदे, हे शौर्य नसून डरपोकपणा आहे. दिल्लीपुढे गुडघे टेकणारे हे लोक छत्रपतींच्या राज्याचे वारसदार असू शकत नाहीत," असा हल्लाबोलही त्यांनी केला.
"१ मे जवळ येत आहे, १०६ हुतात्म्यांच्या रक्ताने हा महाराष्ट्र घडला आहे. जर सरकारमध्ये मराठीच्या मुद्द्यावर कोणी विरोध करत असेल, तर मुख्यमंत्र्यांनी त्या मराठीविरोधी गटावर तात्काळ कारवाई करायला हवी," अशी मागणीही त्यांनी केली.