

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेच्या पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमवारी राजेंद्र जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, भाजपा मंत्री आशिष शेलार, इंद्रनील नाईक, तसेच शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले उपस्थित होते.
विधानभवन येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी अर्ज सादर केला. या एका जागेसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होत आहे. जैन यांच्यासह आणखी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला आहे. परंतु, या अर्जावर अनुमोदक आणि सूचक यांच्या सह्या नाहीत. त्यामुळे हा अर्ज छाननीत बाद होण्याची शक्यता आहे.
विरोधी महाविकास आघाडीने या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीतील चुरस पूर्णपणे संपुष्टात आली आहे. या दोन अर्जांची मंगळवारी छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ११ जून आहे. त्यामुळे आता अर्ज छाननी आणि माघारीच्या औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जैन यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.