

मुंबईः पुढारी वृत्तसेवा : उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे यासाठी राज्यातील शिवसेनाप्रेमी मराठी नागरिकांनी केलेले अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर या दिशेने पहिले सकारात्मक संकेत दोन्ही ठाकरे बंधूनी दिले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ बाबी बाजूला ठेवून उध्दव ठाकरेंच्यासोबत जाण्याची तयारी राज ठाकरे यांनी दाखविल्यानंतर किरकोळ बाबींना बाजूला ठेवण्याची तयारी काही अटीशर्तींसह उध्दव ठाकरेंनीही दाखविल्याने आता तरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का, हा प्रश्न पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चिला जाऊ लागला आहे.
राज ठाकरे यांनी भाजप, शिवसेना(शिंदे) गटाशी मैत्री तोडली तर नक्कीच सोबत येऊ शकतो, असे स्पष्ट संकेत उध्दव ठाकरेंनी दिले. (Raj Thackeray on Uddhav Thackeray)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा उध्दव ठाकरेंना टाळी देण्याचे संकेत दिल्यानंतर शनिवारी शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा थेट जाहीरपणे टाळी दिल्याने रंगू लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना माझ्याकडून जी भांडणं असतील (ती नव्हतीच असेही त्यांनी नमूद केले) मिटवली चला असे म्हणत एक प्रकारे राज ठाकरे यांनी दिलेल्या टाळीला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे या भांडणाचा संदर्भ ते तुम्हाला चर्चा सुरु आहे. त्यावरून लक्षात येईल म्हणत राज यांच्या भूमिकेवर जाहीर भाष्य केलं. (Raj Thackeray on Uddhav Thackeray)
अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते का? अजून तुम्ही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्र खूप मोठा आहे. कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे आणि हे वाद शुल्लक आहेत. एकत्र येणे आणि एकत्र राहाणे फार कठीण गोष्ट आहे, मला असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. फक्त माझ्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतच आहे. मी तर म्हणतो सगळ्या महाराष्ट्रातील पक्षातील मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा”, असे उत्तर त्यांनी मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिले.
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी काही अटींसह मनसेसोबत जाण्याची तयारी दाखविली आहे. "मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी देखील किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहे. मी देखील मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन करतो. पण माझी एक अट आहे," असे उध्दव ठाकरे म्हणाले.
"लोकसभेच्या वेळी आम्ही सांगत होतो, राज्यातून उद्योग गुजरातला पळवून नेले जात आहेत. तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्रविरोधी हे सरकार तिथे बसले नसते. केंद्रात महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसवलं असतं. तसेच राज्यातही महाराष्ट्राचा विचार करणारे सरकार बसले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा आणि मग तडजोड करायची हे असे चालणार नाही", अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.
"महाराष्ट्राच्या हिताच्या जो आड येईल त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतील बसणार हे आधी ठरवा. मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. माझ्याकडून कुणाशी भांडणे नव्हतीत, पण मिटवून टाकली चला. सर्व मराठी माणसांनी ठरवायचं भाजपसोबत जायचे की शिवसेनेसोबत म्हणजे एसंशिं, गद्दार नव्हे तर माझ्यासोबत जायचे", असेही उद्धव ठाकरे म्हणाले.