

मुंबई : मिलिंद कारेकर
या परिसराला आता मलबार हिल म्हणत असले तरी पूर्वी तो वाळकेश्वर या नावाने प्रसिद्ध होता. मुंबईतले थंड हवेचे ठिकाण. एकीकडे अतीश्रीमंत वस्ती, तर दुरीकडे या डोंगरावरची सामान्य कुटुंब. वाळकेश्वरचा या डोंगरावर इमारती बांधताना नियमांचे उल्लंघन करून अनेक बांधकामे झाली आहेत. त्याचाच फटका आता येथील रहिवाशांना बसत असून दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मलबारहील टेकडीवरच्या वाळकेश्वर मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुख्य रस्त्यावरून दरड कोसळल्याने काहीकाळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तर रुबीना इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित करावे लागले.
अशाच प्रकारची एक दुर्घटना करोना काळात घडली होती. मलबर हिलच्या मार्गावर दरड कोसळून संपूर्ण राडारोडा पेडररोडच्या रस्त्यावर वाहून आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. व्हीआयपी मार्ग असल्याने पालिकेने टेंडर काढून तातडीने भिंत बांधली. सामान्याच्या बाबतीत मात्र अशी तत्परता दाखवली जात नाही, अशी नाराजी येथील रहिवाशांनी व्यक्त केली.
कमी वेळात जास्त पाऊस, बिल्डरांना नियमबाह्य दिलेल्या परवानग्यांमुळे झालेले खोदकाम त्यामुळे डोंगराखालच्या दगड माती विस्कळीत होऊन वाळकेश्वर डोंगराच्या विविध भागात पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वाळकेश्वर डोंगरावरच्या उंच इमारतीत राहणार्या रहिवाशांचे
जनजीवन आता धोक्यात आले आहे. इथल्या स्थानिक रहिवाशी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते मिळून भूगर्भशास्त्रज्ञांकडून वाळकेश्वर डोंगराची पाहणी करण्याची मागणी उचलून धरली आहे.
वाळकेश्वरच्या डोंगरावर इमारती बांधताना नियमांचे उल्लंघन होत आहे. याबाबत महापालिका डी विभाग आणि मुंबई कलेक्टर यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. कलेक्टर लँडवर अशा प्रकारे बांधकाम होत असताना संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. एखादी मोठी घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे का?
हेमा शिर्के, स्थानिक महिला
2011 साली वाळकेश्वरच्या एका टोकाला असलेल्या हिरा पन्ना मार्केट मागे दरड कोसळून एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले होते. महानगरपालिकेने दोन इमारती खाली करून अनेक कुटुंबांना स्थलांतरित केले होते. दोनपैकी एक इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे तर दुसरी इमारत आजही रहिवाशांच्या वादात धोकादायक अवस्थेत उभी आहे.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून वाळकेश्वर डोंगरात दरड कोसळून दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटनाही घडू शकते. त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांकडून मलबारहिल टेकडीची पाहणी करणे गरजेचे आहे. वातावरण बदल, अतिवृष्टी, बिल्डरांना दिलेल्या चुकीच्या परवानग्या आणि खोदकामामुळे मलबारहील टेकडी खचत चालली आहे.
संतोष दौंडकर, माहिती अधिकार कार्यकर्ते