

मुंबई : रेल्वे टेंडरसाठी बँक गॅरंटी देण्याची बतावणी करून एका खासगी कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी आशिषकुमार हरिश्चंद्र सिंग, हरिचंद्र विष्णूदत्त तिवारी, हेमंत हरिश जोशी आणि सॅम डिसोजा या चार आरोपींना चारकोप पोलिसांनी अटक केली. ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. यातील तक्रारदार एका खासगी कंपनीत पीआरओ म्हणून कामाला असून त्यांच्या कंपनीचे अंधेरी परिसरात कार्यालय आहे. या कंपनीला बंगलोर येथे रेल्वे विभागाचे क्रॉस लाईनचे एक कंत्राट मिळाले होते.
मात्र त्यांच्या बँक खात्याचे बँक गॅरंटी संपल्याने त्यांना रेल्वे टेंडरसाठी 38 कोटीच्या बँक गॅरंटीची गरज होती. याच दरम्यान जय दोशी आणि ब्रिजेश भुट्टा या दोघांनी त्यांना 38 कोटीचे बँक गॅरंटी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कमिशन म्हणून साडेचार कोटी घेतले. नंतर बँकेकडून अशी कुठलीही बँक गॅरंटी दिली नसल्याचे समजल्यावर कंपनीने चारकोप पोलिसांत तक्रार केली.