

मुंबई : मुंबईत भटक्या श्वानांची दहशत प्रचंड वाढली आहे. रोज सरासरी 70 मुंबईकरांचे लचके ती तोडत आहेत. असे असताना महापालिका रुग्णालयांत यावर उपचार म्हणून अत्यावश्यक असलेल्या अॅन्टी रेबीज लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेले 20 दिवस हे रुग्ण महापालिका रुग्णालयांचे उंबरठे झिजवत आहेत.
महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये सध्या केवळ 1 ते 2 हजार इंजेक्शन उरली आहेत. तीही केवळ आपत्कालीन गरजांसाठीच वापरली जात आहेत. यामुळे या रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.
मुंबईतील 16 संलग्न रुग्णालये आणि 22 ते 23 डिस्पेंसरी तसेच ‘आपला दवाखाना’ मध्ये या लसींचा साठा संपला आहे. पालिका रुग्णालयांना दरमहा सुमारे 30 हजार अॅन्टी-रेबीज इंजेक्शनची गरज असते. मात्र सध्या केवळ 1 ते 2 हजार इंजेक्शन उपलब्ध आहेत.
कुत्रा चावल्यामुळे जखमी झालेल्या 28 वर्षीय पूजा ओव्हल आणि 30 वर्षीय सारंग पाटील यांनी सांगितले की, गोरेगाव येथील टोपीवाला दवाखान्यात इंजेक्शनसाठी गेल्यानंतर तिथे लसीचा साठा उपलब्ध नसल्याचे सांगितले. 48 वर्षीय पूजा सिंग यांनाही अंधेरीतील ‘आपला दवाखाना’त इंजेक्शन मिळाले नाही.
या प्रकरणी संलग्न रुग्णालयांचे प्रमुख डॉ. चंद्रकांत पवार यांनी संपर्क केला, मात्र होऊ शकला नाही. एका वरिष्ठ अधिकार्याकडून सांगण्यात आले की, वेळेवर निविदा न काढल्याने लसींचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. रेबीजसारख्या जीवघेण्या आजाराशी सामना करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
मुंबईत आतापर्यंत 4,30, 594 श्वानांची नसबंदी
महानगरपालिका 1994 पासून मुंबईत भटक्या कुत्र्यांचे नसबंदी करत आहे. 1994 ते जून 2025 पर्यंत 4 लाख 30 हजार 594 भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आल्याचे देवनार कत्तलखान्याचे महाव्यवस्थापक डॉ. कलीम पाशा पठाण यांनी सांगितले.
जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात गर्दी
सर्वत्र इंजेक्शनची कमतरता असल्याने जोगेश्वरी ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये या रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. नागरिकांमध्ये रोष वाढत असताना, मनपाने अजूनही मोठ्या प्रमाणावर टेंडर न काढल्याने प्रश्न गंभीर बनत चालला आहे. केवळ कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयाने 170 लसींसाठी 3 लाखांचे टेंडर काढले आहे, पण हा साठा कमी पडणार आहे.
2024 मध्ये 25,210 जणांना चावा
2022 मध्ये रोज सरासरी 57 नागरिकांना कुत्रे चावल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. 2024 मध्ये या घटनांची संख्या वाढून 25,210 वर पोहोचली आहे.
रेबीज हा एक 100% मृत्यूकारी आजार असून, भारतात दरवर्षी सुमारे 300 जणांचा मृत्यू या आजारामुळे होतो.