

मुंबई : लोकप्रिय कॉमेडी शो चालवणारा प्रसिद्ध कलाकार कपिल शर्मा याच्या मुंबईतील घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
कपिलच्या राहत्या इमारतीची सीसीटीव्ही पाहणी केल्यानंतर त्याला धोका असल्याचे लक्षात आले व सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कपिलच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’वर एकाच महिन्यात दोन वेळा गोळीबार झाला आणि या गोळीबाराची जबाबदारी बिष्णोई अलाईन्सने घेतली. तेदेखील एक कारण या सुरक्षा वाढीमागे आहे. बिष्णोई अलाईन्स म्हणजे निरनिराळ्या गँगस्टर्सच्या टोळ्यांचा एक समूह असून, त्यात गोल्डी धिल्लन, अंकित बंधू शेरेवाला, जितेंद्र गोगी मान ग्रुप, भला राणा, आरजू बिष्णोई, हरी बॉक्सर, शुभम लोणकर आणि साहील दुहान पेटवाड या गँगस्टरांचा समावेश आहे.
कपिल शर्माला धोका निर्माण होण्यात अभिनेता सलमान खानचे कनेक्शनदेखील मानले जाते. काळवीट शिकारप्रकरणी सलमान आधीपासूनच बिष्णोई गँगच्या रडारवर आहे. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर यापूर्वी गोळीबार झाला. तो बिष्णोई टोळीनेच केला होता. आता सलमानशी मैत्रीचे संबंध असलेल्या कपिल शर्माच्या कॅॅफेवर गोळीबार करून या टोळीने सलमानला अप्रत्यक्ष इशारा दिला असावा, असे मानले जाते. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार, कपिल शर्माच्या कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा या कार्यक्रमात एका कलाकाराने शीख धर्माबद्दल आक्षेपार्ह टिपणी केली होती. त्यानंतरच कपिल शर्माला धमक्या येणे सुरू झाले व त्याच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार झाला.