

मुंबई : भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविणाऱ्या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करण्यासाठी मुंबईत येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. १५) महायुतीचे मंत्री व आमदारांची शाळा भरणार आहे. दोन तासांच्या भेटीत पंतप्रधान सर्वांशी संवाद साधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी तिन्ही पक्षांचे मंत्री, आमदारांना उपस्थित राहण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, दुपारी ३.३० च्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटनही होणार आहे.
मुंबईच्या नौदल गोदीत मोदी यांच्या हस्ते सकाळी १०.३० च्या सुमारास 'आयएनएस सुरत', 'आयएनएस नीलगिरी' व 'आयएनएस वाघशीर' या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण होईल. त्यानंतर नौदल गोदीमध्येच पंतप्रधान मोदी महायुतीचे मंत्री व आमदारांची शाळा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आदी नेते मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांसाठी खास जेवणाचाही बेत आखण्यात आला आहे. विधानसभेत महायुतीला यश मिळाले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत गाफील राहू नका, आतापासूनच कामाला लागून महायुतीच्या प्रगतीचा आलेख असाच चढता राहू द्या, असा कानमंत्र पंतप्रधान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींची मुंबई भेट महत्त्वाची मानली जात आहे.