

मुंबई : मुंबईतील एनटीसी 11 चाळींच्या पुनर्वसना बाबत मुंबई विकास नियमावली 2034 प्रस्तावित फेरबदल याविषयी विविध कलमांनुसार म्हाडाने संबंधित रहिवासी यांच्याकडे सोमवार(दि.18)पर्यंत सूचना व हरकती मागविल्या आहेत.त्यामुळे लवकरच या चाळींचा पुनर्विकास होणार आहे.
याबाबत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली मजदूर संघ व एनटीसी चाळ रहिवासी कृती समितीची मजदूर मंजिल येथे नुकतीच बैठक झाली,अशी माहिती मजदूर संघाने दिली.
यावेळी आमदार सचिन अहिर म्हणाले,एनटीसी गिरणी कामगारांनी पुनर्वसनाची संधी सोडता कामा नये.संघटना भाडेकरू यांना कदापि एकाकी पडू देणार नाही. मीदेखील रहिवाशांच्या हितासाठी यावर लेखी सूचना व हरकती मांडणार आहे.
सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी या चाळींचे तत्काळ पुनर्वसन झाले पाहिजे,अशी मागणी केली, तर कृती समिती अध्यक्ष निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष भाऊसाहेब आंग्रे,सचिव किरण गावडे यांनी रहिवासी कामगारांच्या समस्या मांडून समितीमध्ये कायम एकोपा ठेवावा,असे आवाहन केले.
बैठकीस अण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण, शिवाजी काळे,नरेंद्र तारी,अभिनंदन मोरे,रवींद्र नाईक,सुरेश जिकमडे, दीपक कदम, दिलेश जोशी,दीपक राणे,राजू सरमळकर,संजय कांबळे आदी उपस्थित होते.
दरम्यान,तीन पिढ्यांपासून धोकादायक एनटीसी गिरण्यांच्या चाळींमध्ये राहणार्या कामगार रहिवाशांचे लवकरच दिवस पालटणार आहेत.या पुनर्विकासामुळे रहिवासी कामगारांना 405 चौरस फूट चटई क्षेत्रफळाचे निवास मिळणार आहे.